नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील जायंट मानल्या जाणाऱ्या 'एअरटेल' कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल यांनी आपल्या खऱ्याखुऱ्या 'श्रीमंती'चं दर्शन घडवलं आहे. आपल्या एकूण संपत्तीतील 10 टक्के भाग म्हणजे तब्बल 7 हजार कोटी रुपये सामाजिक कामांसाठी दान करण्याची घोषणा केली आहे. भारती फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामं केली जातात.


उद्योगपती सुनील मित्तल हे केवळ 7 हजार कोटींची संपत्ती समाजसेवेसाठी दान करुनच थांबले नाही, तर त्यांनी 'एअरटेल' कंपनीतील आपले 3 टक्के शेअर्सही सामाजिक कामांच्या खर्चासाठी देऊन टाकले.

त्याचसोबत, दुर्बल आणि वंचित समाज घटकांमधील तरुण-तरुणींना मोफत शिक्षण घेता यावं म्हणून 'सत्य भारती विश्वविद्यापीठ' स्थापन करण्याची घोषणाही सुनील मित्तल यांनी केली आहे. हे विश्वविद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी वाहिलेले असेल.

उत्तर भारतात सत्य भारती विश्वविद्यापीठ स्थापन केले जाईल. 2021 साली विश्वविद्यापीठ सुरु करण्याचा मानस मित्तल यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सत्य भारती विश्वविद्यापीठत विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजातील वंचित विद्यार्थ्यांना इथे मोफत शिक्षण देण्याची सुविधा करण्यात येणार आहे.

सुनिल मित्तल कोण आहेत?

एअरटेल' कंपनीचे चेअरमन असलेल्या सुनील मित्तल यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. त्यांचे वडील सत पॉल मित्तल हे लुधियानातून काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार होते. टेलिकॉम, विमा, रिअल इस्टेट, मॉल्स, हॉस्पिटॅलिटी, कृषी इत्यादी क्षेत्रात मित्तल यांचा व्यवसाय आहे. 'भारती एअरटेल' ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.

2007 साली सुनील मित्तल यांना भारतातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार अर्थात 'पद्मभूषण'ने गौरवण्यात आले. 15 जून 2015 रोजी सुनील मित्तल यांनी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या चेअरमनपदी निवड झाली.