तिरुअनंतपूरम :  आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली जेलची हवा खाऊन आलेला क्रिकेटपटू एस. श्रीशांत भाजपकडून केरळ विधानसभेची निवडणूक लढवत आहे. श्रीशांत भाजपचा तिरुअनंतपूरम मतदारसंघातील उमेदवार आहे. मात्र सध्या श्रीशांत ट्विटराईट्सच्या निशाण्यावर आहे.


 

केरळला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आपण काय-काय करणार याबाबतचं ट्विट केलं. मात्र त्याने ट्विटमध्ये केरळ राज्याचा उल्लेख शहर असा केल्याने, नेटीझन्सनी त्याची चांगलीच खिल्ली उडवली.

 

"केरळमध्ये बदल आवश्यक आहे, तो बदल यावेळी नक्की होईल. जर आपण एकजुटीने काम केलं, तर आपण जगातील सुंदर शहर बनवू" असं ट्विट श्रीशांतने केलं.

 

श्रीशांतच्या या ट्विटनंतर  नेटीझन्सनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. केरळ हे राज्य आहे, शहर नाही, अशा आशयाचे ट्विट रिप्लाय श्रीशांतला करण्यात आले. इतकंच नाही तर केरळमध्ये बदल हवा आहे, असं श्रीशांत म्हणत आहे, मात्र केरळचा उल्लेख शहर असा झाल्याने आता बदल झालाच आहे, असा टोमणाही अनेकांनी लगावला आहे.

 

दुसरीकडे केरळमधील काँग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनीही श्रीशांतवर निशाणा साधला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी केरळ आणि राजकारणाचा अभ्यास कर, असा सल्ला थरूर यांनी दिला आहे.