- राज्यपालांकडे ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच : संजय राऊत
- मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेल्या शिवसेनेला महसूल, अर्थ खातं सोडण्याची भाजपची तयारी, सूत्रांची माहिती
Maharashtra Government Formation | राज्यात लवकरच नवं सरकार स्थापन होईल : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 04 Nov 2019 01:05 PM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 40 मिनिटं बैठक झाली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भेट घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण सरकारस्थापने बाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्याला नव्या सरकारची गरज आहे. लवकरच ते स्थापन होईल, असंही म्हटलं. पण यावेळी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी युती शब्द टाळला.
नवी दिल्ली : "महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे आणि ते लवकरच बनेल, याबाबत मी आश्वस्त आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ता स्थापनेवरुन दिली. भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी हे भाष्य केलं. तसंच सत्तेच्या समीकरणासंदर्भात कोण काय बोलत आहे, यावर मी किंवा भाजपमधील कोणीही टिप्पणी करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभेचा निकाल लागून 10 दिवस उलटल्यानंतर अकराव्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. भेटीचा विषय अवकाळी पाऊस नुकसानग्रस्तांच्या मदतीचा असला तरी त्यात राज्यातील सत्ता स्थापनेचा मुद्दा नक्कीच उपस्थित झाला असणार. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना अवकाळी पाऊस नुकसानीसोबत सत्ता स्थापनेबाबत भाष्य केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, "सत्तेच्या समीकरणारसंदर्भात कोण काय बोलत आहे, यावर मी किंवा भाजपमधील कोणीही टिप्पणी देणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे आणि ते लवकरच बनेल, याबाबत मी आश्वस्त आहे." राज्यात नवं सरकार लवकरच स्थापन होईल हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा उल्लेख टाळला. तसंच सरकार कधी आणि कसं स्थापन होणार हे देखील सांगितलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत युतीमधील तिढा लवकरात लवकर सुटण्याची शक्यता नाही. भाजप नेतृत्त्वाने आक्रमक राहण्याचा सल्ला दिल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. संबंधित बातम्या गृहमंत्र्यांनी जास्तीत जास्त मदतीचं आश्वासन दिलं : मुख्यमंत्री अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमित शाह यांची भेट घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले की, "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यात अवकाळी पाऊस झाला, मात्र चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने 325 तालुक्यात शेतीचं नुकसान झालं. अनेक तालुक्यांमध्ये, गावांमध्ये 100 टक्के नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी मी केंद्र सरकारकडे निवेदन घेऊन आलो. कारण या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री असतात. नुकसानीचं संपूर्ण मोजमाप त्यांच्यासमोर ठेवलं. केंद्र सरकारला मदत करण्याची विनंती केली. शाहांनी माझ्यासमोर विविध सचिवांशी बोलून त्यांना निर्देश दिले. विम्याची मदत नीट मिळावी म्हणून गृहमंत्री विमा कंपन्यांशी बैठक घेणार आहेत. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं."