नवी दिल्ली: ‘हम डरनेवाले, झुकनेवाले नही’, आमचा संघर्ष सुरुष राहील, आव्हानांचा सामना करु, अशा शब्दात काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवलं.


"राहुल माझा मुलगा आहे, त्याचं कौतुक करणं उचित ठरणार नाही. राहुलने लहानपणापासूनच हिंसेचं अपार दु:ख सोसलं आहे. राजकारणात त्याने वैयक्तिक टीका सहन केली आहे. त्यामुळे तो आणखी कणखर झाला आहे. त्याने राजकारणात वैयक्तिक टीका सहन केली आहे. त्याची सहनशीलता आणि दृढतेचा मला अभिमान आहे. त्याच्या नेतृत्त्वात परिवर्तन होईल", असा विश्वास असं सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.

काँग्रसे अध्यक्षपदाची सूत्रं राहुल गांधींकडे सोपवल्यानंतर, मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राहुल यांना शुभेच्छा आणि आशिर्वाद दिला.

सोनियांनी काँग्रेसच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला. यावेळी त्या इंदिरा आणि राजीव गांधींच्या आठवणीने भावुक झाल्या.

सोनिया म्हणाल्या, " इंदिरांनी मला मुलीसारखं स्वीकारलं, भारताच्या संस्कृतीशी ओळख करुन दिली. 1984 मध्ये त्यांची हत्या झाली, त्यावेळी माझी आई माझ्यापासून दुरावल्याची भावना होती".

यावेळी राजीव गांधींबाबत सोनिया म्हणाल्या, "राजीव गांधींशी लग्न झाल्यानंतरच माझा राजकारणाशी संबंध आला, त्यापूर्वी राजकारणाशी माझा संबंध नव्हता. मात्र इंदिरांच्या हत्येनंतर सात वर्षांनी माझ्या पतीचीही हत्या झाली आणि माझा आधार माझ्यापासून हिसकावला. गांधी घराण्यातील प्रत्येकजण या देशासाठी झिजला आहे".

तेव्हा हात थरथरत होते

यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या, 20 वर्षांपूर्वी मी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली, तेव्हा माझे हात थरथरत होते. अनेक आव्हानं होती. माझा अनुभव कमी होता, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं. काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली त्यावेळी आमच्याकडे फक्त 3 राज्य होती, केंद्राची सत्ता दूर होती. पण नंतर आम्ही डझनपेक्षा जास्त राज्यात सत्ता मिळवली.

डरेंगे नही, झुकेंगे नाही

आमच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. आम्ही घाबरणारे, झुकणारे नाहीत. आव्हानांचं सामना करु, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

आज देशात अनेक आव्हानं आहेत. आमच्या संस्कृतीवर हल्ले होत आहेत. प्रत्येक ठिकाणी भीतीदायक वातावरण आहे. आपल्याला देशाचं रक्षण करायचं आहे. आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही, असं सोनिया म्हणाल्या.



सोनिया गांधींच्या भाषणातील मुद्दे

  • इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आई दुरावल्याची माझी भावना होती

  • इंदिरांनी मला मुलीसारखं स्वीकारलं, भारताच्या संस्कृतीशी ओळख करुन दिली

  • राजीव गांधींशी लग्न झाल्यानंतरच माझा राजकारणाशी संबंध आला

  • इंदिरांच्या हत्येनंतर सात वर्षांनी माझ्या पतीचीही हत्या झाली, माझा आधार माझ्यापासून हिसकावला

  • देशाच्या कानाकोपऱ्यात दौरे केलेत, लोकांच्या समस्या जाणून घेतल्यात

  • 20 वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेताना माझे हात थरथरत होते

  • काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल राहुल गांधींचं अभिनंदन आणि आशीर्वाद

  • मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली त्यावेळी आमच्याकडे फक्त 3 राज्य होती, केंद्राची सत्ता दूर होती. पण नंतर आम्ही डझनपेक्षा जास्त राज्यात सत्ता मिळवली

  • आव्हानं खूप आहेत, पण आम्ही घाबरणारे नाहीत, झुकणारे नाहीत

  • राहुल माझा मुलगा, त्याचं कौतुक करणार नाही, त्याने लहानपणापासूनच हिंसा पाहिली आहे, त्यामुळे कणखर झाला आहे