नवी दिल्ली : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या आणि मराठवाड्यासह दोन राज्यांच्या जवळचा जिल्हा म्हणून परिचित असलेल्या सोलापूरच्या विमानतळाची नागरिकांना मोठी प्रतिक्षा आहे. सोलापुरातून देशभरात विमानसेवा सुरू झाल्यास येथील दळणवळणाला गती मिळणार असून प्रवाशांना थेट विमानाने दूरपर्यंत कमी कालावधीत पोहोचणे शक्य होणार आहे. आता, विमानतळाची वाट पाहणाऱ्या सोलापूरकरांसाठी गुडन्यूज असून बहुप्रतिक्षित सोलापूर विमानतळावरून लवकरच हवाई वाहतूक सुरू होणार आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेला डीजीसीए परवाना आणि तांत्रिक प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. हवाई वाहतुकीच्या अनुषंगाने आवश्यक असलेली कामे विमानतळावर युद्धपातळीवर सुरू असून सोलापुरकरांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.


सोलापूर (Solapur) विमानतळाबाबतच्या विविध विषयांसंदर्भात नवी दिल्लीत मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली नागरी हवाई वाहतूक (Airplane) मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली, त्यात हे निर्देश देण्यात आले. या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. सुरेश, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, डॉ. शरद कुमार यांच्यासह अक्सा आणि इंडिगो कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याबद्दल अधिक माहिती देताना मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) म्हणाले, ‘उडान-आरसीएसच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलापूर विमानतळासाठी 50 कोटींची विविध विकासकामे झाली आहेत. शिवाय सोलापूर विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण सुरु असून ते लवकरच सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे ‘डीजीसीए’ (नागरी विमानन महानिदेशालय)च्या परवान्यासाठी आणि तांत्रिक बाबींच्या लवकरात लवकर पूर्ततेसाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत’, असेही मोहोळ म्हणाले.


विमान कंपन्यांशीही बोलणीला सुरुवात !


सोलापूरहून देशाच्या विविध ठिकाणी जाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यासह मोहोळ यांनी पुढाकार घेतला असून सोलापूर-तिरुपती, सोलापूर-दिल्ली, सोलापूर-हैद्राबाद या सेवा सुरु करण्यासंदर्भातही मोहोळ यांनी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत सकारात्मक चर्चा केली.




2009-10 साली विमानसेवा सुरू झाली अन् बंद पडली


दरम्यान, सोलापूर विमानतळाचा मुद्दा यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही गाजला आहे. सोलापूर विमानतळ सुरू करण्याचं आश्वासन सर्वच उमेदवारांकडून देण्यात आलं होतं. आता, लवकरच ही विमानसेवा सुरू होणार असल्याचे दिसून येते.  सन 2009-10 च्या दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे विमानसेवा सुरू झाली होती. मात्र, किंगफिशर कंपनी आर्थिक नुकसानीत आल्याने विमान सेवा बंद पडली आणि तेव्हापासून ही सेवा बंदच आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर 2016 साली सोलापूर विमानतळचे नाव उडान योजनेअंतर्गत आले, चाचण्याही झाल्या. पण, विमानसेवा सुरू झाली नाही. 


 हेही वाचा


राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मनीषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी