नवी दिल्ली : शबरीमला मंदिर प्रवेशाचा मुद्दा देशात गाजत असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला आहे. मासिक पाळी आल्यानंतर तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल? असा सवाल केल्यामुळे इराणींवर पुन्हा टीकेची झोड उठू शकते.


केंद्रीय मंत्री असल्यामुळे मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करु शकत नाही. मंदिरात जाऊन देवाची प्रार्थना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र अपमानित करण्याचा नाही. रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का? नाही ना. तसंच, मासिक पाळी आल्यानंतर त्या अवस्थेत तुम्ही देवाच्या घरात कशा काय जाऊ शकाल? असा प्रश्न स्मृती इराणींनी विचारला आहे.

महिलांना मासिक पाळी येणं ही अत्यंत सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे. अशा अवस्थेत तुम्ही मंदिरात जाण्याचा हट्ट आणि प्रार्थना करण्याचा हक्क कसा काय बजावू शकता? असा प्रश्न स्मृती इराणींनी उपस्थित केला. हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही स्मृती इराणींनी स्पष्ट केलं. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन आणि ऑब्झर्व्हर्स रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित परिषदेत स्मृती इराणी यांनी मत मांडलं.

'मी एक हिंदू आहे आणि एका पारशी व्यक्तीशी लग्न केलं आहे. माझ्या मुलांना मी झोराष्ट्रीयन परंपरा शिकवते. जेव्हा मी माझ्या बाळाला घेऊन मुंबईतल्या अंधेरीतील अग्यारीमध्ये गेले होते, तेव्हा मला माझ्या बाळाला नवऱ्याकडे द्यावं लागलं. कारण मला तिथे उभं न राहण्यास सांगितलं होते. माझा नवरा आमच्या बाळाला अग्यारीत घेऊन गेला. कारण पारशी धर्मीयांशिवाय तिथे कोणीही येऊ नये, असा नियमच आहे. तो मी पाळला, आजही तो जेव्हा अग्यारीत जातो तेव्हा मी रस्त्यावर किंवा कारमध्ये त्याची वाट पाहते.' असा किस्सा स्मृती इराणी यांनी सांगितला.

केरळच्या शबरीमला मंदिरात प्रवेशाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असली तरी अनेक संघटना आणि स्थानिकांचा विरोध आहे. गेल्या बुधवारी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर महिलांना प्रवेशापासून रोखण्यात आलं.