नवी दिल्ली: केंद्र सरकारविरोधात धरणं आंदोलन करत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. केजरीवालांसोबत जे काही  होतंय ते चुकीचं आहे, असं म्हणत शिवसेनेने केजरीवालांचे समर्थन केलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकार यांच्यातील राजकीय तणाव वाढला आहे.“अरविंद केजरीवाल करत असलेलं आंदोलन अनोखं आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: केजरीवाल यांच्याशी फोनवर संवाद साधला आहे”, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

“केजरीवाल दिल्लीसाठी चांगले काम करत असून त्यांचे सरकार दिल्लीच्या जनतेतून निवडून आलेले आहे. सध्या जे काही होतंय ते लोकशाहीसाठी घातक आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे, जेडीयूनेही केजरीवालांबाबत सहानुभूती व्यक्त केलीय. “मुख्य सचिवांसोबतच्या गैरवागणुकीनंतर असा प्रकार पुन्हा होणार नाही, असं केजरीवाल यांच्याकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे आयएएस अधिकाऱ्यांनी आता कामावर परतायला हवं”, असं जेडीयू नेते पवन वर्मा यांनी म्हटलं आहे.

केजरीवालांना अजून कोणाकोणाची साथ ?

या सर्व प्रकरणात देशभरातील अनेक पक्षांनी केजरीवालांचे समर्थन केले आहे. यामध्ये ममता बॅनर्जींचा टीएमसी, चंद्राबाबूंचा टीडीपी, एच डी देवेगौडा यांचा जेडीएस, झारखंडमधील ‘झारखंड मुक्ती मोर्चा’, नॅशनल काँन्फरंस तसंच इतर डाव्या पक्षांचाही समावेश आहे.