मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘पद्मविभूषण’ शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आहे. 50 वर्षांपूर्वी 22 फेब्रुवारी 1967 ला शरद पवार बारामती मतदारसंघातून बहुमताने निवडून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले.       




तेराव्या राज्य विधिमंडळामध्ये शरद पवार आजच्या दिवशी सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून येऊन संसदीय करकीर्दीला सुरुवात केली होती.



“आज माझ्या संसदीय कारकीर्दीस 50 वर्षे पूर्ण होत आहे. 1967 साली याच दिवशी मला बारामतीच्या जनतेने प्रचंड बहुमताने निवडून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य केले.  त्यानंतर गेली 50 वर्षे  विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या माध्यमातून अखंडीतपणे मला सेवेची संधी मिळाली. याबद्दल मी जनतेचे अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो.”, असे शरद पवार या निमित्ताने म्हणाले.



शरद पवार पुढे म्हणाले, “मी या 50 वर्षात बरेच चढ-उतार पाहिले, अनेक आव्हानांना सामोरे गेलो. परंतु सर्वसामान्यांची खंबीर साथ आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा यांच्या जोरावर  सार्वजनिक जीवनात मी कार्य करू शकलो. यापुढे ही मी कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, उपेक्षित आणि नवी पिढी समोर ठेऊन कार्य करीत राहील आणि त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहणे पसंत करीन.”