मुंबई : कुठल्याही राज्यपालांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. मात्र लोकशाहीला आघात देण्याचे काम कर्नाटकच्या राज्यपालांनी केलं, त्यामुळे ते राजीनामा देतील अशी अपेक्षा शरद पवार शरद पवारांनी व्यक्त केली.


भाजपच्या कोणत्याही आमिषाला काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार बळी पडले नाही. पंतप्रधानांचं वाक्य “ना खाऊंगा, ना खाने दुंगा, हे पाळलं आमदारांनी पाळलं, त्यांचं अभिनंदनही शरद पवारांनी केलं आहे.

चिंतेची बाब की बहुमत नसताना राष्ट्रीय नेतृत्वाने येडियुरप्पा यांना सरकार बनवण्याची सूचना दिली आणि राज्यपालांनी पण त्यांचाच सत्ता स्थापनेसाठी बोलवलं हे देशाच्या संसदीय लोकशाहीला घातक असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

शपथविधी ते येडियुरप्पांचा राजीनामा, 55 तासात नेमकं काय घडलं?

मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला.

येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं.

सुप्रीम कोर्टाने कालच भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आज दुपारची मुदत दिली होती.

भाजपला बहुमताचा 112 हा आकडा गाठणं अशक्य होतं. पण तरीही आम्ही बहुमत सिद्ध करु, असा दावा भाजप आणि येडियुरप्पांकडून करण्यात येत होता.

दुसरीकडे काँग्रेस 78 आणि जेडीएसने 38 = 116 जागांच्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा केला होता.

त्यामुळे  भाजप सरकार कोसळल्यामुळे, कर्नाटकात आता काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सत्तेवर येणार आहे. जनता दल सेक्युलरचे नेते कुमारस्वामी हे नवे मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

कोण आहेत वजूभाई वाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना वजूभाई वाला गुजरातचं अर्थ मंत्रालय सांभाळत होते. मोदींच्या 13 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात वजूभाईंकडे नऊ वर्ष अर्थ मंत्रालयाची जबाबदारी होती. 2005-06 या काळात वाला हे गुजरातमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते.

राज्याचा अर्थसंकल्प 18 वेळा सादर करण्याचा विक्रम रचणारे 80 वर्षीय वजूभाई एकमेव अर्थमंत्री आहेत. गुजरातमध्ये सत्तांतर झाल्यानंतरही (केशूभाई पटेल ते नरेंद्र मोदी) अस्तित्वात राहिलेल्या मोजक्या नेत्यांपैकी वजूभाई वाला एक आहेत. 2001 मध्ये मोदींच्या पहिल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी वाला यांनी राजकोटची जागा सोडली होती.

वजूभाई वाला राजकोटच्या एका व्यापारी कुटुंबातील आहेत. शालेय जीवनातच ते संघात सहभागी झाले होते. 26 व्या वर्षी वजूभाईंनी जनसंघात प्रवेश केला. केशूभाईंचे ते निकटवर्तीय होते. राजकोटचं महापौरपदही वजूभाईंनी भूषवलं होतं.

1985 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल केला होता. या जागेवरुन त्यांनी तब्बल सात वेळा विजय मिळवला. राजकोटमधील मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क असल्यामुळे वजूभाईंची रिअल इस्टेट संपत्ती वाढल्याचा आरोप त्यांच्यावर होत राहिला, मात्र वजूभाईंनी त्याचा फारसा प्रभाव पडू दिला नाही.

आपल्या मजेदार भाषणांसाठी वजूभाई प्रसिद्ध आहेत. गर्दीला आकर्षित करण्यात त्यांचा हातखंडा आहे. वजूभाई वाला त्यांच्या काही वक्तव्यांमुळे चर्चेचा विषयही ठरले होते. कॉलेजमध्ये विद्यार्थिनींनी फॅशनपासून दूर राहावं, असा सल्ला दिल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.