गांधीनगर : राज्यसभा निवडणुकीत शंकरसिंह वाघेलांच्या दणक्यानंतरही काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा विजय झाला. पण पटेलांच्या विजयावरुन शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. 'अहमद पटेलांचा विजय हा मतांमुळे नाही. तर काँग्रेसच्या षडयंत्रामुळे झाल्याचा,' घणाघात शंकरसिंह वाघेलांनी केला.


वाघेला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ''अहमद पटेलांच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. पण काँग्रेसनं मतं रद्द करण्याचं षडयंत्र सुरुवातीच केलं होतं. वास्तविक, निवडणूक आयोगाने त्या दिवशीचे सर्व आमदारांचे व्हिडीओ पाहण्याची गरज आहे. राघव पटेल यांचं मत रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसनं सुरुवातीलाच सर्व आखणी केली होती.''

वाघेला पुढे म्हणाले की, ''दोन आमदारांनी भाजपला मत दिलं होतं. जर यामागे षडयंत्र नसलं असतं, तर अहमद पटेलांच्या विजयाचा प्रश्नच उपस्थित झाला नसता. अहमद पटेल चांगले व्यक्ती आहेत. त्यांचा हिशेब दिल्लीवाले करणार होते. पण तरीही ते विजयी झाले, ही चांगली गोष्ट आहे.''

दरम्यान, काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदरांचं मत रद्द झाल्यानंतर या निवडणुकीत विजयाची समीकरणं बदलली होती. अहमद पटेलांना विजयासाठी 43.5 मतांची आवश्यकता होती. पण त्यांना 44 मतं मिळाली. अहमद पटेलांना जी 44 मतं मिळाली, त्यातील 41 काँग्रेस, जेडीयू एक, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि भाजपच्या एका बंडखोर आमदाराच्या मताचा समावेश होता.

दुसरीकडे शंकरसिंह वाघेलांसह एकूण आठ आमदारांना काँग्रेसनं निलंबित केलं असून, त्यांनी मंगळवारी क्रॉस वोटिंग केलं होतं. काँग्रेसनं याप्रकरणी कारवाई करत, आठही आमदारांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.