नवी दिल्ली : देशातील मुस्लिमांमधील असुरक्षिततेच्या भावनेबाबत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या विधानावर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी तिखट शब्दात टिप्पणी केली आहे. अन्सारी यांचं विधान त्यांच्या पदाला अनुसरुन नाही, असं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. तर जर अन्सारींना मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना दिसत होती तर त्यांनी आधीच राजनीमा देऊन जनतेत जायला हवं होतं, अशा शब्दात शिवसेनेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.


आधीच राजीनामा का दिला नाही?
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, "जर हमीद अन्सारींना मुस्लिमांमध्ये असुरक्षितता दिसत होती तर त्यांनी याबाबाब आधीच राजीनामा का दिला नाही. आता जात असताना ते अशाप्रकरची विधान करत आहेत. त्यांनी आधीच पदाचा राजीनामा देऊन जनतेमध्ये जायला हवं होतं. अल्पसंख्याक मुस्लिमांसाठी देशातील बहुसंख्य हिंदूंकडे चुकीच्या पद्धतीने पाहिलं जातं. देशाची संपूर्ण ताकद मुस्लिमांच्या सुरक्षेसाठी लावली आहे, असंही राऊत म्हणाले.

देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना : अन्सारी

हमीद अन्सारी काय म्हणाले?
"देशाच्या मुस्लीम समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. देशाच्या विविध भागांमधून मला अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. भारतीय समाज वर्षानुवर्ष विविधतावादी आहे. पण आता हे वातावरण धोक्यात आहे. नागरिकांच्या भारतीयत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची प्रवृती अतिशय चिंताजनक आहे.
तथाकथित गोरक्षकांचे हिंसक हल्ले, कथित घरवापसी, राष्ट्रवादाचा अतिरेकी, अंधश्रद्धेचा विरोध करणाऱ्यांची हत्या या घटना भारतीय मूल्यांना, संस्कृतीला मारक ठरत आहेत. आपल्याच नागरिकांसाठी कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्याची सरकारी अधिकाऱ्यांची क्षमताही वेगवेगळ्या स्तरावर कमी पडत आहे," असं अन्सारी म्हणाले.

भारतासारखं स्वातंत्र्य दुसराकडे कुठेच नाही
भाजप नेते गिरीराज सिंह म्हणाले की, संपूर्ण जगात भारतीय नागरिकांएवढं कोणीही सुरक्षित नाही. इथे कोणीही काहीही करु शकतं. इथे कोणीही दगडफेक करणाऱ्यांचं समर्थन करतात. कोणीही फुटीरतावाद्यांना पाठिंबा देऊ शकतो. इथ रात्रीही दहशतवाद्यांसाठी मध्यरात्री कोर्ट उघडू शकतात. त्यामुळे भारतात हिंदू आणि मुसलमान सर्वच सुरक्षित आहेत. भारतसारखा देश जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेला देश सापडणार नाही. भारतात कोणीही शिव्या देऊ शकतात. पण भारतात राहायचं असेल तर कायदा एकच असेल. अयोध्येसाठी एक आणि तिहेरी तलाकसाठी दुसरा कायदा हे भारतात चालणार नाही.