नगरोटातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे सात जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 29 Nov 2016 08:56 PM (IST)
श्रीनगर : जम्मूच्या नगरोटातील आर्मी कँपमध्ये दहशतवाद्यांशी सुरु असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे 7 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे दोन वीरपुत्रही धारातीर्थी पडले आहेत. 35 वर्षीय संभाजी यशवंत कदम हे नांदेड जिल्ह्यातील जानापुरी गावचे आहेत. तर 32 वर्षांचे मेजर कुणाल गोसावी हे पंढरपूरचे आहेत. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरु आहे. सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवान टिपून मारत आहेत. मात्र पोलिसांच्या वेशात शिरलेल्या काही दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जवान शहीद झाले. मंगळवारी सकाळी जम्मूच्या उपनगराबाहेर असलेल्या 166 क्रमांकाच्या युनिटवर 3 ते 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर भारतीय जवानांनीही हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. ज्यात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. मेजर कुणाल गोसावी नऊ वर्षांपूर्वीच सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी उमा, मुलगी आणि दोन भाऊ आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जानापुरी गावचे रहिवासी असलेले लान्स नायक संभाजी यशवंत कदमही या हल्ल्यात धारातीर्थी पडले. कदम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि 3 वर्षांची मुलगी आहे.