नवी दिल्ली : देशभरात दिवाळीनंतर कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता काही राज्यांनी संचारबंदी लावण्यास सुरुवात केली आहे. गुजरातच्या अहमदाबाद आणि मध्य प्रदेशातील पाच शहरांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तर काही राज्यांमध्ये शाळा आणि बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


अहमदाबादमध्ये 57 तासांची संचारबंदी
दिवाळीदरम्यान आणि त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर गुजरात सरकारने अहमदाबादमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. अहमदाबाद शहरात शुक्रवारी (20 नोव्हेंबर) रात्री 9 वाजल्यापासून सोमवारी (23 नोव्हेंबर) सकाळी सहा वाजेपर्यंत 57 तासांची संचारबंदी असेल. मात्र गुजरात सरकारने कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यास नकार दिला आहे. आम्ही राज्यव्यापी लॉकडाऊनवर विचार करत नाही, असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सांगितलं.


मध्य प्रदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये आजपासून कर्फ्यू
मध्य प्रदेशच्या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा रात्रीचा कर्फ्यू शनिवारी (21 नोव्हेंबर) रात्रीपासून सुरु होईल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी (20) कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी केली होती.


चौहान म्हणाले की, "राज्याच्या भोपाळ, इंदूर, विदिशा, रतलाम आणि ग्वालियर या पाच राज्यांमध्ये शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी सह वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू असेल." रात्रीत संचारबंदी लागू होत असला तरी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होमार नाही. सोबतच औद्योगिक युनिट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अडचण येणार नाही. राज्या शाळा आणि कॉलेज बंद राहतील. तर नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शाळेत जाऊ शकतात.


हरियाणा आणि मुंबईत शाळा बंद
हरियाणा सरकारने मागील महिन्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. पण हरियाणाच्या अनेक शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या शिक्षण विभागाने या संदर्भात नियमावली जारी केली. नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 2 नोव्हेंबरला शाळा पुन्हा सुरु केल्या होत्या.


तर दुसरीकडे कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असेलल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आता 31 डिसेंबरपर्यंत सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा बंद राहणार आहेत. दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा झालेली वाढ लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने याबाबत आदेश दिले आहेत.


राजस्थानमध्ये कलम 144
राजस्थान सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 21 नोव्हेंबरपासून कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्याची सूचना दिली आहे. गृह विभागाच्या ग्रुप-9 च्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निर्देश जारी केले आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राजस्थानमध्ये थंडीसोबतच नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्याही वाढण्यास सुरु झाली आहे. राजस्थानमध्ये 19 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच एका दिवशी अडीच हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.


गर्दीने लावली वाट, आता कोरोनाची दुसरी लाट? दिल्ली, अहमदाबाद, मध्य प्रदेशात निर्बंध वाढले