नवी दिल्ली : नाशिक आणि अहमदनगरच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका फेटळाली. त्यामुळे आता मराठवाड्याला 8 टीएमसी पाणी मिळणार आहे.


तहानलेल्या मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी जायकवाडी धरणात काल (30 ऑक्टोबर) सकाळी पाणी सोडण्यात येणार होतं. मात्र जायकवाडीला पाणी सोडण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांनी या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिका केली होती. त्यावर कोर्टाने आज म्हणजे 31 ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली होती.

तर नाशिकमधील गंगापूर आणि दारणा, तसेच अहमदनगरच्या भंडारदरा आणि निळवंडे या धरणांतून एकाच वेळी पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीमुळे तहानलेल्या मराठवाड्याला पाण्यासाठी दोन दिवस आणखी प्रतीक्षा करावी लागली. अखेर आज सुप्रीम कोर्टाने या याचिका फेटाळल्याने मराठवाड्याला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एकूण किती पाणी सोडणार?
जायकवाडी धरणामध्ये विविध धरणांमधून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानुसार मुळामधून 54 दलघमी (1.90 टीएमसी), प्रवरामधून 109 दलघमी (3.85 टीएमसी), गंगापूर धरणातून 17 दलघमी (0.60 टीएमसी), दारणा धरणातून 57.50 दलघमी (2.04 टीएमसी), पालखेड समुहातून 170 दलघमी (60 टीएमसी) असं एकूण 254 दलघमी (8.99 टीएमसी) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.