मोदीजी, मला असुरक्षित वाटतंय, निरुपम यांच्या पत्नीचं पत्र
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2016 11:03 PM (IST)
मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईकवरुन टीका केल्यानंतर त्यांच्या पत्नीनं आपल्याला सुरक्षित वाटत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. संजय निरुपम यांच्या पत्नी गीता यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे. आपल्याला अत्यंत गलिच्छ शब्दात धमक्या येत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. आपल्या पतीने केलेलं भाष्य राजकीय स्वरुपाचं होतं, त्यावर वेगळ्या पद्धतीने उत्तर देता आलं असतं, मात्र टीकाकारांनी नीच पातळी गाठल्याचं त्या म्हणतात. आपल्या घरी धमकीचे फोन आले. विरोधकांना संपवण्यासाठी हा मोदींचाच डाव असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्याचंही निरुपम यांनी म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेलं सर्जिकल स्ट्राईक बनावट असल्याचा दावा निरुपम यांनी केला होता.