नवी दिल्ली : तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीच्या सीमांवर जवळपास 80 दिवसांपासून शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) 18 फेब्रुवारी रोजी देशभरात रेलरोको अभियान राबवण्याची घोषणा केली.


संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं की, ''18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून चार वाजेपर्यंत संपूर्ण देशभरात रेलरोको अभियान राबवलं जाईल. तसंच 12 फेब्रुवारीपासून राजस्थानचे सर्व टोलनाके मोफत करणार असल्याचंही संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं.


14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनी जवान आणि शेतकऱ्यांसाठी कँडल मार्च आणि मशाल मार्च काढण्यात येईल. तर 16 फेब्रुवारीला सर छोटू राम यांच्या जयंतीनिमित्त किसान सॉलिडिरिटी शो केला जाईल, असंही संयुक्त किसान मोर्चाने सांगितलं


संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं की, "शेतकऱ्यांच्या हिसासाठी हरियाणातील जनतेने भाजप आणि जेजेपीच्या नेत्यांवर दबाव टाकावा किंवा त्यांना खुर्ची रिकामी करण्यास सांगावं."


दिल्लीतल्या शेतकरी मोर्चाचा पुढील अजेंडा

  • - 14 फेब्रुवारी : संध्याकाळी साते ते आठच्या दरम्यान शहीद किसान आणि जवान यांच्या स्मरणार्थ मशाल/कँडल मार्च

  • - 16 फेब्रुवारी : देशभरात सर छोटूराम जयंती

  • - 18 फेब्रुवारी : दुपारी 12 ते 4 दरम्यान रेलरोको

  • - 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती देशभरात साजरी केली जाणार


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच लोकसभेत शेतकऱ्यांचं आंदोलन पवित्र असल्याचं म्हटलं. सोबतच आंदोलनजीवींनी हे आंदोलन अपवित्र केल्याचं सांगितलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "संसद आणि सरकार शेतकऱ्यांचा अतिशय आदर करतं आणि तिन्ही कृषी कायदे कोणासाठीही बंधनकारक नाही तर पर्यायी आहेत. अशात विरोधाचं कोणतंही कारण नाही."


शेतकरी संघटना दिल्लीच्या सिंघु, गाझीपूर आणि टिकरी सीमेवर सुमारे 80 दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. केंद्र सरकारने नवे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे.


आपल्या मागणीसंदर्भात शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या दरम्यान दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शेतकरी संघटनांनी 6 फेब्रुवारी रोजी तीन तासांच्या चक्काजामची घोषणा केली होती.