रांची : रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिलं. चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहाच्या भक्कम खेळींच्या जोरावर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियावर आघाडी घेण्यात यश आलं. मात्र, रिद्धिमान साहला पंचांनी बाद केल्यानंतर, त्याविरोधात रिद्धिमान साहनं DRS वापरल्यामुळे साहाला जीवदान मिळालं. पण यामुळे ऑस्ट्रेलियनं संघात कमालीची नाराजी पाहायला मिळाली.


वास्तविक, आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच ओव्हरमधील पेट कमिंसनं रिद्धिमानला लागला. पण तो चेंडू रिद्धिमानच्या पॅडला लागल्यानं ऑस्ट्रेलियन संघानं जोरदार अपील केली. यानंतर फिल्ड अंपायर क्रिस जॅफ्नी यांनी साहाला बाद घोषित केलं.

पंचाचा निर्णय चुकीचा असल्याने, साहाने तत्काळ चेतेश्वर पुजाराचा सल्ला घेऊन DRS चा निर्णय घेतला. यावेळी थर्ड अम्पायरने रिप्ले पाहून रिद्धिमान साह बाद नसल्याचं घोषित केलं. यानंतर टीम इंडियानं तंबूत मोठा जल्लोष केला. यावेळी टीम इंडियाचा सलामीवीर मुरली विजने जी प्रतिक्रिया दिली, ती पाहून ऑस्ट्रेलियन संघ कमालीचा नाराज झाला.

डीआरएसमुळं रिद्धिमान साहला जीवदान मिळाल्यानं कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि जलद गती गोलंदाज पेट कमिंस यांच्या चेहऱ्यावर नाराजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. या जीवदानानंतर रिद्धिमान साहानंही खणखणीत शतक झळकावून ऑस्ट्रेलियन संघाला चोख प्रत्युत्तर दिलंय. मात्र ऑकिफच्या चेंडूवर मॅक्सवेलकडे झेल देऊन 117 धावांवर तो बाद झाला.


दरम्यान, भारतीय संघाने 8 गडी बाद 569 धावा ठोकून 118 धावांची आघाडी मिळवली आहे. भारताच्या वतीने सर्वाधिक धावा या चेतेश्वर पुजारानं (202) झळकावल्या. सध्या रविंद्र जडेजा 31 आणि उमेश यादव 6 धावांवर खेळत आहे.