कानपूर : एकीकडे पंजाब नॅशनल बँकेत साडे 11 हजार कोटीच्या घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता कानपूरमधून पाचशे कोटीपेक्षा जास्त रकमेचा बँक घोटाळा समोर येत आहे. या घोटाळ्यात रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांचं नाव असल्याची माहिती आहे.


विक्रम कोठारी यांनी पाच सरकारी बँकांकडून पाचशे कोटीपेक्षा जास्त कर्ज घेतलं होतं. याला एक वर्ष उलटूनही अद्याप एकही रुपया बँकेकडे जमा केलेला नाही. विशेष म्हणजे, विक्रम कोठारी सध्या कुठे आहेत, याचा कुणालाही पत्ता नाही.

कानपूरमधील मालरोडवरील सिटी सेंटरमध्ये रेटोमॅक कंपनीचं ऑफिस आहे. पण ते देखील गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. विक्रम कोठारी यांनी नियम धाब्यावर बसवून कर्ज घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे.

कोण आहेत विक्रम कोठारी?

  • पान परागचे संस्थापक एम.एम.कोठारी यांचे विक्रम कोठारी हे पुत्र आहेत.

  • वडिलांच्या मृत्यूनंतर विक्रम कोठारी यांनी स्टेशनरीचा व्यावसाय सुरु केला.

  • रोटोमॅक नावाने त्यांनी पेन, स्टेशनरी आमि ग्रीटिंग्स कार्डसचं काम सुरु केलं.

  • काही वर्षातच त्यांनी रोटोमॅक नावाची मोठी कंपनी स्थापन केली.

  • माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विक्रम कोठारी यांना सन्मानित केलं होतं.


या प्रकरणी यूनियन बँकेचे मॅनेजर पी.के. अवस्थी यांनी विक्रम कोठारी यांनी त्यांच्या बँकेतून 485 कोटी रुपयाचे कर्ज घेतले असल्याचं सांगितलं. तसेच त्यांच्यावर NCNT अंतर्गत कारवाई असून, त्यांच्या संपत्तीच्या विक्रीची प्रक्रियाही सुरु असल्याचं स्पष्ट केलं.

तर दुसरीकडे विक्रम कोठारी यांनी अलाहाबाद बँकेकडून 352 कोटीचं कर्ज घेतलं होतं. कोठारी यांनी कर्जाची परतफेड वेळेत न केल्यास, त्यांच्या संपत्तीची विक्री करुन पैसे रिकव्हर केले जातील, असं बँकेचे मॅनेजर राजेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं.