Road Accidents In India : देशभर गुळगुळीत रस्ते बनवण्याचे काम वेगात सुरु आहे. मात्र याच गुळगुळीत रस्त्यांवरील अपघाताची संख्याही वाढली आहे. एका महिन्यातच दोन मोठ्या व्यक्तींच्या अपघाती निधनामुळे रस्ते अपघाताची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. एक जानेवारी 2017 ते यावर्षीच्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत तब्बल 41 हजार 143 व्यक्तींचा राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर अपघाती मृत्यू झाला आहे. आरटीआय अंतर्गत ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 


मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू  झाला. तर सायरस मिस्त्री यांचा पालघर जवळील महामार्गावरील अपघातात मृत्यू झाला.  एक महिन्याच्या आत महाराष्ट्रात घडलेल्या या दोन अपघातांमुळे रस्ते अपघातांची वाढती संख्या आणि त्यासोबत मृत्यूच्या वाढत्या आकद्यांकडे लक्ष वेधले गेले आहे. मात्र या दोन घटना फक्त प्रातिनिधिक आहेत. महाराष्ट्रात गेल्या साडे पाच वर्षांत राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर तब्बल 41 हजार 143 व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाल्याचे माहितीच्या आधिकराच्या माध्यमातून समोर आले आहे..
 
 राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण 85 हजार 999 अपघातात 41 हजार 143 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात ट्रक, बस आणि इतर मोठ्या वाहनात बसलेल्या व्यक्तीपेक्षा कार, टॅक्सी, व्हॅनमध्ये बसलेल्यांच्या मृत्यूचे प्रमाण सुमारे 25 टक्के आहे.. आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीप्रमाणे कारमध्ये बसलेल्या 9 हजार 672 प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. तज्ञांच्या मते सध्याच्या आधुनिक कारमध्ये सुरक्षेचे अनेक उपाय असतानाही कारमधील प्रवाशांच्या एवढ्या मोठ्या संख्येने होणाऱ्या मृत्यू मागे तीव्र गती एक कारण आहेच. मात्र, ज्या ब्लॅक स्पॉट वर काही अपघात होतात, त्याच ठिकाणी इतर वाहन चालक सुखरूप पुढे जातात, त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वाहन चालकाचे कौशल्य यासह त्याची दक्षता हे मुद्दे ही लक्षात महत्वाचे असल्याचे परिवहन विभागातील तज्ज्ञ अधिकाऱ्यानं वाटते..  


सध्याच्या बहुतांशी कार सुरक्षेचे अत्याधुनिक उपाययोजनासह असतात.. तरी वाहनात बसलेले प्रवासी सुरक्षेच्या उपायांचा फायदा मिळेल यासाठी आवश्यक कृती करत नाही.. मागचे प्रवासी सीटबेल्ट लावत नाही... त्यामुळे अनेक वेळेला एअरबॅग सारख्या फीचर चा फायदा त्यांना मिळत नाही, असे ही तज्ञांना वाटते. तसेच कार चालवताना तीव्र गती ही बहुतांशी अपघातासाठी कारणीभूत असल्याचे वाहतूक तज्ञांना वाटते. राज्यात एकामागून एक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचे प्रवास अधिक गतिमान होणार आहे. अशात भविष्यात तीव्र गती आणि नियमांकडे दुर्लक्ष अनेकांच्या जीवनासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे चकचकीत रस्त्यांसह सुरक्षेच्या उपाययोजनांकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे.