श्रीहरीकोटा : इस्रोने भारतीय अंतराळ संशोधनात मानाचा तुरा रोवत RISAT 2B चं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. आंध्रप्रदेशातील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र, श्रीहरीकोटामधून आज सकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आलं. या उपग्रहाच्या माध्यमातून अवकाशातून हेरगिरी आणि टेहळणी करणाऱ्या विमानांवर लक्ष ठेवता येणार आहे. इस्त्रोने आज पीएसएलव्ही-सी 46 मधून रिसेट-2 बी या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं आहे. सकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी श्रीहरिकोटामधून या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. रिसेट-2 बी हा उपग्रह 300 किलो वजनाचा आहे.




पृथ्वीच्या सर्वात खालच्या कक्षेत हा उपग्रह स्थापन केला आहे. हा उपग्रह 555 किलोमीटर उंचीवर स्थापन करण्यात आला आहे. RISAT 2B उपग्रह आपत्ती, संरक्षण आणि सीमेवर लक्ष ठेवणार आहे. हा उपग्रह सतत कार्यरत रहावा यासाठी उपग्रहासोबत सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) इमेजरही अंतराळात पाठवण्यात आला आहे. त्यामुळे हा उपग्रह इमेजिस घेण्यास सक्षम असेल, ज्यामुळे शत्रूराष्ट्रांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येणार आहे.

या उपग्रहाच्या माध्यमातून देशाच्या सीमांवर लक्ष ठेवणं सहज शक्य होणार आहे. तसंच घुसखोरीलाही आळा घालता येणार आहे. या उपग्रहाव्यतिरिक्त इस्रो आणखी पाच उपग्रह लॉन्च करणार आहे. त्यांची नावं RISAT-2BR1, RISAT-2BR2, RISAT-1A, RISAT-1B, RISAT 2A अशी असतील.

हा उपग्रह ढगाळ वातावरणात आणि खराब हवामानाच्या परिस्थितीतही एचडी इमेज घेण्यात सक्षम असेल. मुसळधार पाऊस, रात्रीचा अंधार कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उपग्रह उच्च प्रतीच्या इमेज टिपू शकतो. सर्जिकल स्ट्राईकवेळी आपले उपग्रह कमी पडलेल्या ठिकाणी हा उपग्रह उत्तम कामगिरी बजावू शकणार आहे. त्यामुळेच या उपग्रहाला अंतराळातील भारताचा सिक्रेट डोळा समजलं जात आहे.

येत्या 2020 सालापर्यंत भारत आपल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषा सुरक्षित करण्यात पूर्णपणे सक्षम होणार आहे. पुढील 10 महिन्यांमध्ये इस्रो आणखी आठ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. यातील पाच उपग्रह देशाच्या सीमांवर नजर ठेवणार आहेत.