चेन्नई : राज्यकर्ता अनुभवी असेल तर कसे धडाडीचे निर्णय घेतले जातात हे नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या तामिळनाडूत दिसून येऊ लागले आहे. तामिळनाडूच्या नव्या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी एका मंत्र्यावरती दिली आहे. हे मंत्री जिल्ह्याच्या मुख्यालयी राहतील. त्यांच्यासोबत एक वरिष्ठ सनदी अधिकारी असेल. या दोघांच्या शिवाय त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा मिळून कोविडचे व्यवस्थापन करतील. दुसरीकडे महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक मृत्यू झालेल्या राज्यात मात्र आजही पालकमंत्री सक्रीय नाहीत असे सार्वत्रिक चित्र आहे. 


मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी रविवारी आपल्या मंत्र्यांना 10 मेपासून सुरू झालेल्या दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनची संपूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगितले. कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा अपव्यय कसा टाळता येईल याची काळजी घेण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची अधिक बाधा आणि रूग्ण संख्या असलेल्या 14 जिल्ह्यांमधील कोविड-नियंत्रण उपायांचे पर्यवेक्षण, आढावा घेण्यास आणि समन्वय करण्यासाठी 22 मंत्र्यांची नेमणूक केली आहे.  मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत स्टॅलीन यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की त्यांनी रेमडेसिवीरच्या विक्रीवर नजर ठेवावी. कोणतेही औषध, अँटी-व्हायरल औषध काळ्या बाजारात विकली जात नाही ना हे पाहण्याच्या जबाबदारी मंत्र्यावर आहे.


मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व घटकांना कोणताही पक्षपात किंवा भेदभाव न करण्याचे वचन दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, 'तामिळनाडूचे उत्कृष्ट राज्यात रूपांतर करण्याची आणि पुढच्या पिढीच्या सशक्तीकरणासाठी हे सरकार काम करत आहे. हे सरकार द्रमुक पक्षाचे सरकार नाही. हे सरकार सर्व लोकांचे आहे."  


काही जिल्ह्याची दोन मंत्र्यांवर जबाबदारी असेल. तर काही जिल्ह्यांना एक मंत्री नियुक्त करण्यात आले आहे. अधिक कोरोना बाधित जिल्ह्यांकडे मंत्री विशेष लक्ष देतील. कोविड उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांचे समन्वय करतील. लॉकडाऊनच्या नियमांचे योग्य पालन केले जाईल याची खात्री करुन घेतील. या मंत्र्याचे नियोजन आरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम करतील.  मंत्री पीके सेकर बाबू हे चेन्नईचे प्रभारी असतील.  ग्रामीण उद्योगमंत्री आयएम अंबरासन चेंगलपेट तर वनमंत्री के रामचंद्रन आणि नागरी पुरवठा मंत्री आर चक्रपाणी कोयंबटूरचे प्रभारी असतील. तुतीकोरिन हा जिल्हा समाज कल्याण मंत्री गीता जीवन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अनिता राधाकृष्णन यांच्याकडे असेल तर ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी हे सालेमचे प्रभारी आहेत.


तामिळनाडूत नुकत्याच निवडणूका झाल्यात तरी महाराष्ट्रासारखी तिथे परिस्थिती झाली नाही त्याचे कारण आता विरोधी पक्षात असलेल्या पक्षाने निवडणुकीच्या काळातही कोरोनोचा प्रसार वाढणार नाही याकडे दिलेले लक्ष असे सांगितले जात आहे.