गृह आणि वाहनकर्ज आणखी स्वस्त होणार, सर्व प्रकारची कर्ज रेपो रेटशी जोडण्याचे आरबीआयचे बँकांना आदेश
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2019 06:07 PM (IST)
गृहकर्ज, वाहनकर्ज आणि लघू उद्योगांसाठीचं कर्ज स्वस्त होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या तीनही प्रकारांमधील कर्ज एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली : गृहकर्ज, वाहनकर्ज आणि लघू उद्योगांसाठीचं कर्ज स्वस्त होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या तीनही प्रकारांमधील कर्ज एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जांवर मनमानी व्याजदर आकारणाऱ्या बँकांना चाप बसणार आहे. आरबीआयने सातत्याने व्याजदरात कपात केली आहे. परंतु त्याचा थेट ग्राहकांना फायदा मिळत नव्हता. त्यामुळे आरबीआयने कर्ज रेपो रेटशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. वेळोवेळी आरबीआयने रेपो रेट कमी केले आहेत. त्यानंतर ठरावीक राष्ट्रीय बँकांनीदेखील व्याजदर कमी केले. परंतु अनेक बँकांनी त्या प्रमाणात कर्जांवरील व्याजदर कमी केले नाहीत. परिणामी सामान्यांना आरबीआयच्या कमी केलेल्या रेपो रेटचा फायदा मिळत नव्हता. स्वतः आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत खंत व्यक्त केली होती. अखेर यावर तोडगा म्हणून सर्व प्रकारची कर्ज रेपो रेटशी जोडण्याचे आदेश आरबीआयने बँकांना दिले आहेत.