नवी दिल्ली : सरकारच्या नाही तर भारतातील 100 कोटी हिंदूंच्या हिंमतीवर राम मंदिर बांधलं जाईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं आहे. श्रीराम हे संपूर्ण विश्वाचे आहेत, मग त्यांचं मंदिर अयोध्येतच का? असा प्रश्न फारुक अब्दुल्ला यांनी राम मंदिराबद्दल बोलताना उपस्थित केला होता. अब्दुल्ला यांना प्रतिउत्तर देताना गिरीराज सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे.


गिरीराज सिंह यांनी अब्दुल्ला यांचा समाचार घेताना, 'मक्काच्या ऐवजी हज दुसऱ्या जागी नेले तर चालेल का? राम मंदिर अयोध्येत नाही तर काय मक्का-मदिनामध्ये बांधणार का?' असा सवाल देखील केला.

यावेळी लोकसंख्या नियंत्रणावर देखील गिरीराज सिंह यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, लोकसंख्या नियंत्रण संबंधी कायदा करण्यात यावा. तसेच जो कोणी या कायद्याचे पालन करणार नाही, त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात यावा, अशी तरतूद करण्यात यावी. तसेच देशात अल्पसंख्यांकांची व्याख्याही बदलण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.