Raju Shetti : देशातील 250 हून अधिक शेतकरी संघटना (Shetkari Sanghtna) एमएसपी (MSP) गॅरंटी किसान मोर्चेच्या (Kisan Morcha) माध्यमातून किमान हमीभाव व संपुर्ण कर्जमुक्तीसाठी निर्णायक आंदोलन करून केंद्र सरकारला (Central Govt) गुडघे टेकायला भाग पाडणार असल्याचा इशारा स्वाभिनानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिलाय. 25 राज्यातून आलेल्या 250 हून अधिक शेतकरी संघटनांची दिल्लीत बैठक पार पडली. यावेळी राजू शेट्टींनी इशारा दिला. 


किमान हमीभावाच्या कायद्यासाठी केंद्र सरकार दुर्लक्ष 


दिल्ली येथील रकाबगंज गुरूव्दार येथे केंद्र सरकारने किमान हमीभावाचा कायदा पारित करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा देशभरातील शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारला आहे. भारत देश हा कृषीप्रधान आहे. मात्र, देशातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत. 2011 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हमीभावाच्या अभ्यासासाठी समिती गठीत केलेली होती. त्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या समितीने हमीभावाचा कायदा पारित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार 11 वर्षापासून सत्तेत असताना किमान हमीभावाच्या कायद्यासाठी केंद्र सरकार दुर्लक्ष करू लागले आहे. आज देशभरातील शेतकरी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन , कापूस , हरभरा , तूर , मक्का,भात विकू लागला आहे यामुळे देशातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी झाला आहे. यावर्षी केंद्र सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे शेट्टी म्हणाले.


सोयाबीनचा हमीभाव 4900 रूपये पण शेतकऱ्यांना मिळतायेत 3300 ते 3500 रुपये


आज देशामध्ये सोयाबीनचा किमान हमीभाव 4900 रूपये असताना सोयाबीनचा आजचा दर 3300 ते 3500 रुपये झाला आहे. म्हणजेच जवळपास क्विंटलला 1400 ते 1600 रूपयांचे नुकसान होवू लागले आहे. यंदाच्या वर्षी देशात 130 लाख टनापेक्षा जास्त सोयाबीनचे उत्पादन होणार आहे. जर शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 1000 ते 1300 रुपयाचा फटका बसू लागला तर एका हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे 2 लाख 08 हजार कोटी रूपयाचे नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने शाश्वत किमान हमीभावाचा कायदा पारित केला असता तर देशभरातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाभ झाला असता असे शेट्टी म्हणाले. 


हमीभावाचा कायदा आल्यास शेती अर्थव्यवस्था मजबूत होईल


केंद्र सरकार उद्योगपती धार्जिणे आयात निर्यातीचे धोरणे राबवत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. केंद्र सरकारनं हमीभावाचा कायदा मंजूर केल्यास शेतकऱ्यांना शाश्वत हमीभाव मिळू लागल्यास देशातील शेती अर्थव्यवस्था मजबूत होईल. अन्यथा गहू , साखर , तांदूळ निर्यात करणा-या  देशाला आता गहू आयात करण्याची वेळ आल्याने हेच शेतीविषयक धोरणांचे केंद्र सरकारचे अपयश आहे. यावेळी एम. एस. पी गॅरंटी किसान मोर्चाचे वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेता राहूल गांधी यांना हमीभावाच्या कायद्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. या बैठकीस समन्वयक सरदार व्ही.एम. सिंग , राजाराम त्रिपाठी , चंद्रशेखर कुडेहाळी ,आमदार यावर मीर , दयानंद पाटील , यांचेसह देशभरातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस ऊपस्थित होते.


महत्वाच्या बातम्या:


आताचे राजकारणी धंदेवाले, सत्ताधाऱ्यांची दुकानं बंद करण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करतोय : राजू शेट्टी