Rajinikanth in Politics : तमिळनाडू (Tamil Nadu) मधील गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकीय पक्ष निवडणुकांच्या दृष्टीने सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्कीच आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये थलैवा म्हणजेच, रजनिकांत निवडणूक लढवणार का? यासंदर्भात आज म्हणजेच, 30 नोव्हेंबर रोजी अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय इनिंगबाबत मोठी घोषणा करू शकतात.


निवडणूक लढण्याचे दिले संकेत


तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा (Tamil Nadu Assembly Election) निवडणूकीपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांत यांचं राजकारणातील एन्ट्रीबाबत वक्तव्य समोर आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून संकेत मिळाले आहेत की, रजनीकांत विधानसभा निवडणूक लढू शकतात. तमिळनाडूतील सर्व राजकीय पक्षांची नजर आज होणाऱ्या रजनीकांत यांच्या संघटनेच्या बैठकीवर आहे. कारण या बैठकीनंतरच रजनीकांत पुढल्या वर्षी होणारी तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 लढवणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.


आज मिळू शकतं रजनीकांत यांच्या राजकीय इनिंगचं उत्तर


2021मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणूकांमध्ये रजनीकांत आणि त्यांच्या संघटनेची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता मिळालेली नाही. आज होणाऱ्या बैठकीनंतर या रहस्यावरून पडदा उठणार आहे, रजनीकांत यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं आहे की, सर्वात आधी ते रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतरच विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील.


गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय आहेत रजनीकांत


रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतरित्या अद्याप त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षी अभिनेता कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र येऊन राजकारणाची इनिंग खेळणार असल्याच्या चर्चांनी तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ माजली होती.


सोशल मीडियावरही #RajinikanthPoliticalEntry हॅशटॅग ट्रेंड


रजनीकांत यांच्या राजकीय एन्ट्रीबाबत चर्चा रंगल्यानंतर ट्विटरवर #RajinikanthPoliticalEntry हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. यापूर्वी रजनीकांत यांनी 2017 साली डिसेंबरमध्ये घोषणा केली होती की, तमीळनाडूमध्ये राजकीय पक्षाची स्थापना करणार. पण त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूकीत सहभाग घेतला नव्हता. मात्र यावेळी ते राजकारणात निश्चित प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.