नवी दिल्ली : विमान तिकिटांच्या धरतीवर आता मागणी वाढल्यानंतर ट्रेनचं तिकीटही महागणार आहे. सणासुदीच्या काळात ट्रेनचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. तर कमी मागणी असणाऱ्या मार्गावर आणि विना पॅन्ट्री ट्रेनचं तिकीट स्वस्त होऊ शकतं.


रेल्वेने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एअरलाईन्सच्या धरतीवर ट्रेन तिकिटाचे दर वाढवण्याचे आणि घटवण्याचे संकेत दिले होते. रेल्वेच्या पूर्व, पश्चिम आणि पश्चिम-मध्ये झोनने याबाबत सादरीकरणही केलं असल्याचं वृत्त आहे.

दिवाळी, होळी, ख्रिसमस आणि नवीन वर्षात रेल्वेचं तिकीट महाग करण्याचा प्रस्ताव आहे. तर कमी व्यस्त मार्गांवर रेल्वे तिकिटात सूट देण्याचा विचार आहे.

''विमान कंपन्या आणि हॉटेल यांच्या डायनॅमिक प्राईसिंगचा रेल्वे सध्या अभ्यास करत आहे. आतापर्यंत तिकिटाचे दर वाढू नये, यावर काम सुरु होतं. मात्र यापलिकडे जाऊन आता तिकिटाचे दर कसे स्वस्त होतील, यावर काम सुरु आहे. रेल्वेचे तिकीट संपूर्ण बुक झाले नाही, तर विमानाप्रमाणेच तिकीट बुकिंगमध्ये सवलत देण्याचा विचार आहे'', असं पियुष गोयल काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

''हॉटेलमध्ये डायनॅमिक प्राईसिंग आहे. अगोदर किंमत कमी असते, नंतर किंमती वाढतात आणि उरलेल्या रुमसाठी वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून सूट मिळते'', असंही पियुष गोयल म्हणाले होते.