अहमदाबाद : सध्या देशाचंच नव्हे तर अवघ्या जगाचं लक्ष गुजरातच्या निवडणुकीकडे लागलं आहे. अर्थात नरेंद्र मोदींचं गुजरात. गेल्या तीन महिन्यांपासून गुजरातमध्ये प्रचाराचा धुरळा उडाला. अगदी मंदिर, मस्जिद, जातीचं राजकारण, पाटीदारांचं आरक्षण, दलितांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नांनी काहूर माजवलं आहे.


पहिल्या टप्प्यातलं मतदान 9 तारखेला पार पडलं आणि दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 14 तारखेला होणार आहे. पण त्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना या निवडणुकीबद्दल, प्रचाराच्या पातळीबद्दल एबीपी न्यूज नेटवर्कला विशेष मुलाखत दिली.

यावेळी राहुल गांधींनी गुजरातमध्ये काँग्रेसचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल असाही राहुल गांधींनी दावा केला आहे.

राहुल गांधी मुलाखत जशीच्या तशी :

प्रश्न : दोन दिवसानंतर तुम्ही काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार संभाळणार आहात आणि त्याच्या दोनच दिवसानंतर गुजरातचा निकाल आहे. काय सांगाल याबाबत?

राहुल गांधी : यंदा गुजरातमध्ये भाजपबाबत बराच राग आहे हे मला जाणवलं. गुजरातसाठी जे व्हिजन द्यायचं होतं ते व्हिजन भाजप आणि मोदीजी देऊ शकले नाही. त्यामुळे मला वाटतं की, काँग्रेस गुजरातमध्ये निवडणूक जिंकेल. आम्ही चांगल्याप्रकारे जनतेला विचारुन, प्रत्येक वर्गाला विचारुन व्हिजन दिलं आहे. हे आमचं व्हिजन नाही तर गुजरातच्या सरकारचं व्हिजन आहे.

प्रश्न : या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी कशी असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं?

राहुल गांधी : मला संपूर्ण विश्वास आहे की, ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होईल. यात 92 जागांचा प्रश्न नाही. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी असेल. कारण लोकांच्या भावना आता बदलल्या आहेत.

प्रश्न : नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारत हा नारा आणला होता. आता देशात फार कमी राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. तुम्हाला काय वाटतं हे केवढं मोठं आव्हान आहे?

राहुल गांधी : काँग्रेस पक्ष जुनी विचारधारा आहे. ही भारतमुक्त होऊ शकत नाही. जर देश काँग्रेसमुक्त झाला तर नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातील अर्धा वेळ काँग्रेसला का दिला असता? काँग्रेसची जी विचारधारा आहे ती आणखी रुजवण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रेमानं राजकारण करा, आजकाल राजकारणात ज्या पद्धतीनं बोललं जातं ते चुकीचं आहे. ते देशाला शोभत नाही. वैचारिक मतभेद हे असतातच पण तरीही थोडं तारतम्य बाळगून बोललं गेलं पाहिजे.

प्रश्न : मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा या निवडणुकीवर परिणाम होईल?

राहुल गांधी : पंतप्रधान हे भारताचं प्रतिनिधीत्व करतात. त्या पदाचा मान हा राखलाच गेला पाहिजे. मी एकदम क्लिअर मेसेज दिला आहे. मणिशंकरजी जे बोलले ते माझ्यासाठी कधीही स्वीकारण्यायोग्य नाही. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, अशा शब्दात पंतप्रधानांबाबत आपल्या पक्षात बोललं जाणार नाही. पंतप्रधान आणि आमच्या जरुर मतभेद आहेत. मोदींना आमच्याबाबत काहीही बोलू दे. पण आमच्या पक्षातील लोकं त्याच्याबाबत आक्षेपार्ह बोलणार नाहीत.

प्रश्न : मोदींनी असाही आरोप केला की, मनमोहन सिंह यांनी पाकिस्तानी लोकांशी बैठक केली. त्याकडे तुम्ही कसं पाहता?

राहुल गांधी : मनमोहन सिंह यांनी खूप चांगलं उत्तर दिलं. की, ‘मी भारताचा पंतप्रधान होतो. संपूर्ण आयुष्य मी भारतासाठी दिलं आहे.’ पण एखाद्या माजी पंतप्रधानाबाबत अशा पद्धतीनं पंतप्रधानांनी बोलणं हे त्यांना शोभत नाही.

प्रश्न : प्रचाराच्या शेवटच्या दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं वक्तव्य केली जात आहेत त्यानं निवडणुकीचा मूड बदलला आहे?

राहुल गांधी : नाही... मी गेल्या तीन-चार महिन्यापासून मूड पाहतो. मला पूर्ण विश्वास आहे की, भाजपला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

VIDEO:


 

राहुल गांधीच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे :

LIVE : यंदाची निवडणूक एकतर्फी होईल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे : राहुल गांधी

LIVE : गुजरातच्या जनतेमध्ये भाजपविरोधात चीड, जनतेला अपेक्षित व्हिजन देण्यात भाजप अपयशी : राहुल गांधी

LIVE : मणीशंकर अय्यर पंतप्रधानांबद्दल जे  बोलले ते चूकच होतं, पक्षात असं बोलणं खपवून घेतलं जाणार नाही असा थेट मेसेज मी दिला आहे : राहुल गांधी 

LIVE : मनमोहन सिंह यांच्याबाबत नरेंद्र मोदी जे बोलले, ते शोभा देणारं नव्हतं : राहुल गांधी



LIVE : आम्ही चांगल्याप्रकारे जनतेला विचारुन, प्रत्येक वर्गाला विचारुन व्हिजन दिलं आहे. हे आमचं व्हिजन नाही तर गुजरातच्या सरकारचं व्हिजन आहे. गुजरातची विधानसभा निवडणूक एकतर्फी होईल. : राहुल गांधी

LIVE :  काँग्रेस पक्ष जुनी विचारधारा आहे. ही भारतमुक्त होऊ शकत नाही. जर देश काँग्रेसमुक्त झाला तर नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातील अर्धा वेळ काँग्रेसला का दिला असता? : राहुल गांधी

LIVE : सध्या राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, ती देशाला न शोभाणारी. भाषा वापरताना तारतम्य बाळगायला हवं. : राहुल गांधी

LIVE :  पंतप्रधान देशाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या पदाचा आदर राखलाच पाहिजे. : राहुल गांधी

LIVE : पंतप्रधानांबाबत मणिशंकर अय्यर यांचं विधान स्वीकारण्यायोग्य नाही. : राहुल गांधी

LIVE : आमचे पंतप्रधानांसोबत वैचारिक मतभेद आहेत. आमच्याबद्दल काय बोलावं, हे त्यांच्यावर आहे. पण काँग्रेसचे लोक त्यापद्धतीने बोलणार नाहीत. : राहुल गांधी