राहुल गांधी दोन जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे नेते दिपक सिंह यांनी दिली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मोदींनी गुजरातच्या वडोदरासह उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधूनही निवडणूक लढवली होती.
दिपक सिंह याबाबत सांगताना म्हणाले की, राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत. म्हणून ते अमेठीसह वायनाडमधूनही लाखांच्या फरकांने निवडणूक जिंकतील. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी सुद्धा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे ही पारंपारीक बाब आहे, असं दिपक सिंह म्हणाले.
केरळच्या स्थानिक नेत्यांनी राहुल गांधीनी केरळमधून निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती. शिवाय वायनाड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. काँग्रेसने केरळमधील 20 लोकसभा मतदारसंघातील 16 जागांवर निवडणूक लढणार आहे. आतापर्यंत काँग्रेसने 14 जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.