रचकोंडा (तेलंगणा): तेलंगणातील रचकोंडा पोलिसांनी नागरिकांसाठी 'रचकोंडा सिटीझन फीडबॅक सर्व्हिस' ही नवी सुविधा सुरु केली आहे. या नव्या सुविधेमुळे आता नागरिकांना थेट फोनवरुनच तक्रार नोंदवता येणार आहे.


या नव्या यंत्रणेमुळे नागरिकांना थेट फोनवरुन आपल्या समस्या पोलिसांपर्यंत पोहचवता येणार आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिली. तेलंगणाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अंजनी कुमार यांनी या सुविधेचे उद्घाटन केले.

फीडबॅक सॉफ्टवेअर हे कॉल सेंटर सिस्टिमशी लिंक करण्यात आलं असून नागरिकांच्या समस्या आणि सूचना या ऑपरटेरकडून नोंदवल्या जाणार आहेत. या नव्या सुविधमुळे नागरिकांना पासपोर्ट व्हेरिफिकेशन, ट्रॅफिक चलान, तक्रार नोंदवणं आणि पोलिसांचा प्रतिसाद यासारख्या गोष्टींबाबत आपल्या प्रतिक्रिया देता येणार आहेत.

'रचकोंडा पोलिसांकडून मिळणाऱ्या सुविधांपासून नागरिक समाधानी आहेत की नाही हे फीडबॅक सर्व्हिसमधून समजणार आहे. तसेच कोणत्या सुविधांमध्ये अधिक सुधारणांची गरज आहे हे देखील आम्हाला यावरुन नक्कीच समजेल.' असं आयुक्त महेश भागवत यांनी सांगितलं.

'फक्त तक्रार दाखल करणं यापुरताच मर्यादित न राहता ट्रॅफिक मॅनेजमेंट, आणीबाणी प्रतिसाद व्यवस्थापन, गुन्हेगारी प्रतिबंध, न्यायालयीन काम यासारख्या विभागतही फीडबॅक सुविधा सुरु करण्याचा आमचा विचार आहे.' अशीही माहिती भागवत यांनी यावेळी दिली.