रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, आरएसी तिकीटांच्या संख्येत वाढ
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2016 08:08 AM (IST)
मुंबई : भारतीय रेल्वेनं प्रवाशांना खूशखबर दिली आहे. रेल्वे प्रशासनानं आरएसी कोट्यातील जागांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आरएसी कोट्यातून जास्त लोक प्रवास करु शकतील. 16 जानेवारीपासून हे नवीन बदल लागू होणार आहेत. आरएसी अर्थातच रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन आहे. यात रेल्वेतील जागा संपल्यानंतर राखीव कोट्यातील जागा विभागून दिल्या जातात. मात्र या प्रवासासाठी तिकीटदरात कोणतीही सवलत दिली जात नाही. आरएसी सुविधा राजधानी, शताब्दी आणि दुरंतो एक्स्प्रेस वगळता बाकीच्या सर्व गाड्यांमध्ये मिळणार आहे. 16 जानेवारीनंतरच्या सर्व तिकीट बुकिंगवेळी या जादाच्या सीट्स प्रवाशांना मिळणार आहेत. काय आहे आरएसी कोटा आरएसी कोटा अर्थातच रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन सुविधा लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध असते. या कोट्यात काही जागा राखीव ठेवलेल्या असतात. गाडीतील जागा भरल्यावर वेटलिस्टेड तिकीटाऐवजी काही जागा या कोट्यातून भरल्या जातात. या प्रकारच्या तिकीटांवर कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नाही. मात्र दिलेली सीट विभागून दिली जाते. आरएसी कोट्यातील जागा स्लीपर कोच 10 बर्थऐवजी 14 बर्थ दिले जाणार, त्यामुळे 28 प्रवासी प्रवास करु शकतील 3 एसी 4 बर्थऐवजी 8 बर्थ दिले जाणार, त्यामुळे 16 प्रवासी प्रवास करु शकतील. 2 एसी 4 बर्थऐवजी 6 बर्थ दिले जाणार, त्यामुळे 12 प्रवासी प्रवास करु शकतील.