नवी दिल्ली : प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी अजब सल्ला दिला आहे. पाणी पिण्यासाठी यापुढे पेल्याचा वापर न करता, ओंजळीने पाणी प्या. शिवाय दात घासण्यासाठी प्लास्टिकचा ब्रश न वापरता 'दातून' वापरा, असे उपाय मीनाक्षी लेखी यांनी सुचवले आहेत. गुरुवारी (5 सप्टेंबर) झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, "आपल्याला पेल्यात आणि बाटल्यांची गरजच काय? जेव्हा आपण शाळेत होतो, तेव्हा हाताने पाणी प्यायचो. मला वाटतं की ही सर्वात स्वच्छ पद्धत आहे. कारण या प्रक्रियेत तुम्ही तुमचे हात धुवता आणि पेला धुण्यासाठी पाणी पाणीही वाया जात नाही."

जेव्हा भाजीवाला यायचा तेव्हा आपण वेताच्या टोपलीचा वापर करत होतो. कोणतंही प्लास्टिक नव्हतं. आपली दातून वापरण्याची सवयही सुटली. आता हे प्लास्टिकचे टूथब्रश कचाऱ्यात जातात आणि हा कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये. पर्यावरणपूरक बॅग आणि सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी जुन्या कपड्यांचा वापर करण्याचा सल्लाही मीनाक्षी लेखी यांनी दिला.

त्या म्हणाल्या की, "जेव्हा सॅनिटरी नॅपकिन्सवर 18 टक्के जीएसटी लावला तेव्हा महिलांनी टीका केली. आम्ही पॉलिमरच्या वापरला प्रोत्साहन देत आहे, असा आरोप विचार न केला. पण माझी आजी, तुमची पणजी प्रत्येकीने कपड्याचा वापर केला होता, जे वापरानंतर नष्ट केले जाऊ शकतात. यावर आणखी चर्चा केली तर सॅनिटरी पॅड्सच्या रुपात प्लास्टिक, पॉलिमरचा वापर कमी करण्यात मदत होईल."

2022 पर्यंत एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकचा वापर संपवण्याचं अभियान पंतप्रधान मोदी राबवत आहे. पंतप्रधान येत्या 2 ऑक्टोबरला म्हणजेच महात्मा गांधीजींच्य जयंतीच्या निमित्ताने काही वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा करु शकतात.