चंडीगड : पंजाबमध्ये  विषारी दारुमुळे आतापर्यंत 86 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 46 लोकांचा मृत्यू काल शनिवारी झाला आहे. पंजाबमधील पाकिस्तानच्या सीमेलगतच्या अमृतसर, गुरुदासपूर आणि तरन तारण या तीन जिल्ह्यांमध्ये बनावटी दारुमुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पंजाब सरकारने महसूल विभागाचे काही अधिकारी आणि काही पोलिस अधिकाऱ्यांना देखील निलंबित केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आणि कर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक पथक स्थापन केलं आहे.


पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलंय. तर माजी उप-मुख्यमंत्री आणि शिरोमणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी काँग्रेस सरकारवर अवैध दारु विक्रीला अभय दिलं असल्याचा आरोप केला आहे.


अनेक अधिकारी निलंबित, 25 जणांना अटक

पंजाबमधील पाकिस्तानच्या सीमेलगतच्या अमृतसर, गुरुदासपूर आणि तरन तारण या तीन जिल्ह्यांमध्ये बनावटी दारुमुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. प्रशासकीय स्तरावर डोळेझाक केल्याप्रकरणी सरकारने महसूल विभागाच्या 7 कर्मचाऱ्यांसह 6 पोलिसांना निलंबित केलं आहे. तर या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आतापर्यंत या प्रकरणी छापामारी करत 25 लोकांना अटक केलं आहे.

 दारु विक्रीला अभय दिल्याचा शिरोमणि अकाली दलाचा आरोप

माजी उप-मुख्यमंत्री आणि शिरोमणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी काँग्रेस सरकारवर अवैध दारु विक्रीला अभय दिलं असल्याचा आरोप केला आहे.  काँग्रेस आमदार सुखविंदर सिंग डॅनी आणि फॉरेस्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष साध सिंग सिंधू यांच्याविरोधात अवैध दारुविक्रीला संरक्षण दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  काँग्रेस आमदारांच्या दबावामुळे अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई केली नसल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणीही शिरोमणी अकाली दलाने केली आहे.