नवी दिल्ली : पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्याचा कट पाकिस्तानात सहा महिन्यांपूर्वीच शिजल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयात हा कट रचण्यात आला होता.


दहशतवाद्यांनी खेळलेल्या रक्तरंजित खेळाचे तीन महत्त्वाचे सूत्रधार होते. मसूद अजहर, राशिद गाजी आणि आदिल अहमद दार उर्फ वकास हे तिघे. विशेष म्हणजे काश्मिरातील दहशतवादी संघटनांनाही या कटाची कानोकान खबर लागू दिली नव्हती.

बुरहान वानी या दहशतवाद्याला तीन वर्षांपूर्वी भारतीय जवानांनी ठार केलं होतं. त्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारानंतर जम्मू आणि श्रीनगरमधील तरुण मोठ्या प्रमाणावर दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाले होते. आदिल दार हा गेल्या वर्षी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी होता.

VIDEO | भारतावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदची कहाणी | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



आदिल अहमद या हल्ल्यात असलेला मानवी बॉम्ब अर्थात आत्मघातकी हल्लेखोर होता. त्याला गेल्या वर्षभरापासून मानसिकदृष्ट्या तयार करण्यात आलं होतं. आदिल प्रशिक्षणासाठी पाकिस्तानलाही गेला होता. त्याचा हँडलर 9 फेब्रुवारीला आपल्या दोन साथीदारांसोबत भारतात आला होता. दक्षिण काश्मिरमध्ये हे सर्व जण लपून बसले होते.

दक्षिण काश्मिरच्या अवंतीपुरा भागात गुरुवारी दुपारी जैश ए मोहम्मदने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. हा इतिहासातील सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर पाकिस्तानविरुद्ध पहिलं मोठं पाऊल उचललं आहे. व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेव्हर्ड नेशन'चा दर्जा काढण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकीत घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.