मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व पेट्रोल पंप आज (20 फेब्रुवारी) संध्याकाळी 20 मिनिटांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. 20 मिनिटं सर्व पेट्रेल पंपावरील दिवे मालवण्यात येणार असून सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. द कन्सोर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सने (सीआयपीडी) हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या महाराष्ट्रातील पेट्रोल डीलर्स संघटना (फामपेडा) यात सहभागी होणार आहे.


सीआयपीडीचे देशभरात 56 हजार पेट्रोल पंप आहेत. या सर्व पेट्रोल पंपावर बॅनर आणि फोटो लावून तिथले दिवे आज संध्याकाळी 7 ते 7.20 दरम्यान मालवले जातील. तसंच दोन मिनिटं मौन पाळून शहीदांना आदरांजली वाहण्यात येईल, असं सीआयपीडीचे प्रभारी सरचिटणीस के सुरेश कुमार यांनी सांगितलं.

भारतीय सैन्याप्रती असलेली कृतज्ञता आणि ऐक्य दर्शवण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन पेट्रोल डीलर्सने केलं आहे. तर गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांनी या कालावधीपूर्वी किंवा नंतर पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावं, असं संघटनेने म्हटलं आहे.

पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.