लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri) रविवारी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. लखीमपूर खेरी या ठिकाणी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला जाणाऱ्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना अटक केल्याची माहिती युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी दिली आहे. 


युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "भाजपकडून जे अपेक्षित होतं शेवटी तेच घडलं. महात्मा गांधींच्या लोकशाहीवादी देशात गोडसेच्या भक्तांनी भर पावसात आणि पोलिसांशी संघर्ष करत शेतकऱ्यांच्या भेटीला जाणाऱ्या आमच्या नेत्या प्रियांका गांधी यांना हरगाव मधून अटक केली आहे. मोठ्या लढाईची ही तर केवळ सुरुवात आहे."


 






दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर, आशिष मिश्रावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या दबावामुळे पोलिसांनी आशिष मिश्रावर हत्या, गैरव्यवहार, दुर्घटना करण्याचा हेतू अशा विविध आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. 


आज पहाटे साडे चार वाजता लखीमपूर या ठिकाणी शेतकरी नेते राकेश टिकेत पोहोचले असून त्यांनी शेतकऱ्यांची एक बैठक घेतली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी या बैठकीत केली आहे. जोपर्यंत या दोघांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृत शेतकऱ्यांचं अंतिम संस्कार केलं जाणार नाही असा इशारा राकेश टिकेत यांनी दिला आहे.


लखीमपुरात काय झालं होतं?
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या :