लखनौ : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आंदोलन करणाऱ्या लोकांना हे सरकार दहशतवादी म्हणतं, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच सध्याच्या काळात शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय होत आहे. सरकारला कृषी कायदे परत घ्यायचे नाहीत, परंतु, सरकारच्या लक्षात येत नाही की, या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होत आहे.


उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधत प्रियंका गांधी म्हणाल्या की, "सध्याच्या काळात शहीद लोकांना दहशतवादी म्हटलं जातं. शेतकरी आंदोलन आपल्या विरोधात केलेला कारस्थान वाटतं. सरकार शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय करत आहे. जर कोणताही नेता आपलं म्हणणं ऐकत नसेल, तर तो कोणत्याच कामाचा नाही."


शेतकऱ्यांचं आंदोलन सत्येचा मार्गाने सुरु असलेलं आंदोलन : प्रियंका गांधी 


शेतकरी आंदोलनाबाबत काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी बोलताना म्हणाल्या की, "आम्हाला अपेक्षा होती की, शेतकऱ्यांसाठी या सरकारचे दरवाजे उघडतील आणि सुनावणी होईल. पण असं काहीच झालं नाही. जर एखादा नेता गरीबांचा आवाज ऐकू शकत नसेल, तर तो आमचा नेता नाही आहे."


कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, शेतकऱ्यांचं आंदोलन सत्याच्या मार्गाने सुरु असलेलं आंदोलन आहे. हे देशाच्या सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. हे आंदोलन देशवासियांचं आहे. देशातील सर्व लोकांचं आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतून करण्यात आलेलं नाही."


दरम्यान, प्रियंका गांधी अरदासमधील रामपूर येथे गेल्या होत्या. नवरीत यांचा मृत्यू प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील हिंसाचारादरम्यान झाली होती. नवरीत शेतकरी कुटुंबातील होता आणि शेतकऱ्यांच्या रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी दिल्लीला गेला होता. रॅली ठरलेल्या मार्गाने न जाता लाल किल्ल्याच्या दिशेने गेली होती. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नवरीत यांचा ट्रॅक्टर पलटला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.


महत्त्वाच्या बातम्या :