नवी दिल्ली : आज संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करून माहिती दिली. देशात कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मोदी आज सातव्यांदा संबोधणार आहेत. कोरोना संकट पाहता मोदी देशाला काळजी घेण्याचं आवाहन करू शकतात. तसेच देशात सण-समारंभांचं वातावरण असल्यामुळे निष्काळजीपण न करण्याचाही सल्ला देऊ शकतात.


कोरोना संकटात एकूण सहा वेळा पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं आहे. आज सातव्यांदा मोदी देशाला संबोधित करतील. मोदींनी सर्वात आधी 19 मार्च रोजी देशाला संबोधित केलं होतं. त्यानंतर 30 जून रोजी सर्वात शेवटी मोदींनी देशाला संबोधित केलं आहे.





जाणून घ्या कोरोना संकटकाळात केव्हा मोदींनी देशाला संबोधित केलं?


19 मार्च 2020 : 22 मार्च रोजी देशात जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. संध्याकाळी 5 वाजता 5 मिनिटांनसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी 'थाळी नाद, घंटा नाद' करण्याचं आवाहन केलं होतं.


24 मार्च 2020 : 25 मार्चपासून 21 दिवसांसाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.


3 एप्रिल 2020 : सकाळी 9 वाजता व्हिडीओ संदेश जारी केला. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घरांतील सर्व दिवे बंद करून 9 मिनिटांपर्यंत मेणबत्ती, दिवे, टॉर्च किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावण्याचा आवाहन केलं होतं.


14 एप्रिल 2020 : सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं आणि लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला.


12 मे 2020 : पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या पॅकेजच्या विस्ताराबाबत अधिक माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण देतील.


30 जून 2020 : पंतप्रधान मोदी यांनी अन्न योजनेला 30 नोव्हेबर 2020 पर्यंत वाढवलं.


आज मोदी देशासाठी मोठी घोषणा करणार?


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं की, मोदी सरकारने अर्थव्यवस्थेवर कोरोना व्हायरस महामारीचा प्रभाव आणि त्यामुळे जीडीपीमध्ये संभाव्य घट यासंदर्भातील आकलन सुरु केलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आर्थिक चक्राला चालना देण्यासाठी आणखी एका रिलीफ पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.' त्यामुळे आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी देशासाठी आणखी एका रिलीफ पॅकेजची घोषणा करणारा का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


दरम्यान, देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशातच पंतप्रधान सतत नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला मंत्रही दिला आहे की, 'जबतक दवाई नही, तबतक ढिलाई नही.' म्हणजेच, जोपर्यंत औषध नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधणार!