नवी दिल्ली : ऊर्जा खात्याचा दोन वर्षांचा लेखाजोखा मांडण्यासाठी केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद बोलावली, मात्र याचवेळी वीज गेल्याने त्यांची चांगलीच पंचायत झाली.


 
पियुष गोयल ऊर्जा खात्याची प्रगती सांगत असताना पत्रकार परिषदेतच तब्बल तीन वेळा बत्ती गुल झाली. अचानक ओढावलेल्या या परिस्थितीमुळे गोयल भांबावले, मात्र त्यांनी वेळ मारुन नेली. 'बहुत काम करना बाकी है' असा डायलॉग यावेळी गोयल यांनी मारला.

 
'माझी बायको म्हणते, माझ्या प्रत्येक कार्यक्रमात एकदा तरी वीज गेलीच पाहिजे. यामुळे दररोज झोपण्यापूर्वी आपल्याला भरपूर काम करणं बाकी आहे, याची जाणीव होत राहील. म्हणूनच वीज गायब होते, की खरंच जाते, हे मला माहित नाही' अशी खुमासदार प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 
भारतातील प्रत्येक गावात वीज पोहचवण्यासाठी केंद्र सरकारनं संकल्प केला आहे, मात्र असं असताना ऊर्जामंत्र्यांनाच 'बत्ती गुल'चा सामना करावा लागल्याने दबक्या आवाजात चर्चांना ऊत आला होता.