उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पराभवासाठी व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांना जबाबदार धरण्यात येत असून, त्यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून टीका होत आहे. प्रशांत किशोर यांनी ज्याप्रमाणे बिहारमध्ये नितीश कुमार यांना विजय मिळवून दिला, त्याच प्रमाणात ते उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देतील, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षा होती.
पण पक्षाला यश मिळवून देण्यापेक्षा सपाटून मार खावा लागला. त्यामुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यातून लखनऊमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर त्यांच्याविरोधात बॅनरबाजी सुरु झाली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची प्रचाराची व्यूहरचना प्रशांत किशोर यांच्यावर सोपवण्यावरुन पक्षामध्ये मतभेत सुरु आहेत. कारण उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेसच्या युतीसाठी प्रशांत किशोर यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्यावरच पराभवाचं खापर फोडलं जात आहे.