नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू-काश्मीरचा भाग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खडसावून सांगितलं आहे. काश्मीरातील अशांततेबाबत मोदींनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


 
'राष्ट्रीय सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, मात्र जम्मू काश्मीरमधील जनतेचा विश्वास संपादन करायला हवा.' असंही मोदी म्हणाले. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरातील हिंसाचाराबाबत राज्यसभेत झालेल्या वादविवादानंतर ही बैठक बोलावली होती.

 

'जम्मू काश्मीर या राज्याविषयी बोलताना जम्मू, काश्मीरची घाटी, लडाख आणि पाकव्याप्त काश्मीर असे चार भाग पडतात. जम्मू काश्मीरमधल्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केल्याबद्दल मी सर्व राजकीय पक्षांचे आभार मानतो. काही बाबतीत आपले मतभेद असले तरी देशाच्या अखंडतेचा प्रश्न येतो तेव्हा आपली एकजूट होते' असं मोदी म्हणाले.

 
काश्मीरी जनतेच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी लोकसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पावलं उचलली जातील. काश्मीरमधील हिंसाचारात बळी पडलेल्या नागरिकांसाठी आणि जखमींसाठी आम्हाला अत्यंत खेद असल्याचं लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितलं.