Jallianwala Bagh massacre : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काळा दिवस म्हणून 13 एप्रिलचा दिवस ओळखला जातो. कारण 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग या ठिकाणी जमलेल्या हजारो भारतीय नागरिकांवर ब्रिटिश फौजेकडून गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये अनेक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या स्मृतीपित्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांडात प्राण गमावलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहिली. जालियनवाला बागेत मृत्यू झालेल्यांचे अनोखे धैर्य आणि बलिदान येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


13 एप्रिल 1919 मध्ये, ब्रिटिश जनरल डायरने पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील ऐतिहासिक सुवर्ण मंदिराजवळ जालियनवाला बाग येथे रौलेट कायद्याच्या विरोधात शांततापूर्ण सभेला उपस्थित असलेल्या हजारो भारतीयांवर अंदाधुंद गोळीबार केला. ब्रिटीशांच्या गोळीबाराने घाबरलेल्या अनेक महिला आणि मुलांनी आपला जीव वाचवण्यासाठी जवळच्या विहिरीत उड्या घेतल्या. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. तसेच बागेतून निघण्याचा रस्ता अतिशय अरुंद होता, त्यामुळे बाहेर पडताना चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. तर वाचलेले अनेक नागरिक ब्रिटिशांच्या गोळ्यांचे लक्ष्य बनले होते. या घटनेत प्राण गमावलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.  


दरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील या घटनेते प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 103 वर्षांपूर्वी जालियनवाला बाग येथे झालेल्या हत्याकांडाने इंग्रजांच्या निरंकुश राजवटीची क्रूरता दाखवली. आपल्या शूर हुतात्म्यांना विनम्र श्रद्धांजली, हुतात्म्यांचे हे सर्वोच्च बलिदान पुढील पिढीला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देत राहील असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.


13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमध्ये बैसाखी सणाच्या निमित्ताने अनेक शीख बांधव जालियनवाला बागेत जमले होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक सत्यपाल व सैफुद्दीन किचलूच्या अटकेचा लोकांनी निषेध नोंदवला होता. यावेळी जमावबंदीचा आदेश लागू होता ज्याचे उल्लंघन केल्याचे दिसताच या जमावावर गोळीबार करण्याचे आदेश जनरल डायर कडून देण्यात आले. त्यानुसार ब्रिटिश सैनिकांनी गोळीबार केला. अंदाधुंद गोळीबार सुरु झाल्याने अनेकजणांचा यामध्ये मृत्यू झाला. तर बचावासाठी धावाधाव करत असताना चेंगराचेंगरी झाल्याने अनेक जण जखमी झाले. काहींनी जीव वाचवण्यासाठी बागेतील खोल विहिरीत उड्या मारल्या होत्या. यात स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. 


महत्त्वाच्या बातम्या: