मंडी :  भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे. आधी इस्त्राईल सैन्य करायचं, मात्र आता जगाने पाहिलं की भारतीय सैन्यही कमी नाही.पूर्वी इस्त्राईलच्या जवानांची जगभरात चर्चा व्हायची, आता भारतीय जवानांची होते, असं मोदी म्हणाले.


पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मंडी येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं.

आधी इस्राईलची आता भारताची चर्चा

मोदी म्हणाले, "हिमाचल केवळ देवभूमी नाही तर वीरभूमीही आहे. आज जगभरात आपल्या सैन्याच्या पराक्रमाची चर्चा होत आहे. यापूर्वी इस्राईलच्या सैन्याची चर्चा होती, मात्र आता भारतीय जवानांची चर्चा होत आहे. इथे (हिमाचल) प्रत्येक कुटुंबात एक सैनिक आहे. मी त्या सर्व जवानांना आणि वीरांना वंदन करतो"

दरम्यान, मोदींनी मंडी इथं विविध विकासकामांचं उद्घाटन केलं.