नवी दिल्ली : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनेतासाठी पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी जातीयवाद नाही, तर विकासवाद स्वीकारा, असं आवाहन केलं आहे.


मोदी ज्या गुजरात मॉडेलच्या आधारावर पंतप्रधान झाले, त्याच गुजरातच्या विकासावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. गुजरातमध्ये 15 वर्षांनंतर मैदानात उतरलेल्या भाजपला या निवडणुकीत विकास हा एकमेव मुद्दा असेल. त्यामुळे मोदींनी विकासाकडे पाहण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

मोदींचं गुजरातच्या जनतेला पत्र

''22 वर्षांपूर्वी गुजरात कसं होतं आणि आज कसा बदल झालाय. गेल्या काही वर्षांमध्ये भाजप सरकारसोबत मिळून तुम्ही सर्वांनी विकास रथात सहभागी होत देशातच नाही, तर जगभरात गुजरातची ओळख निर्माण केली आहे. विकास आणि गुजरात हे दोन समानार्थी शब्द झाले आहेत'', असं मोदींनी पत्रात लिहिलं आहे.

गुजरात हा आत्मा आहे, तर देश परमात्मा आहे, असंही मोदी म्हणाले. मोदींनी या पत्रातून यूपीए सरकारवरही निशाणा साधला आहे. नर्मदा बंधाऱ्यासाठी सरकारने मदत केली नव्हती, असं मोदींनी म्हटलं आहे, जे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी यापूर्वीच नाकारलेलं आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत यंदा जातीय समीकरणं महत्त्वाची ठरणार आहेत. कारण पाटीदार आरक्षणासाठी हार्दिक पटेलने भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. तर ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचाही काँग्रेसला पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपकडे विकास हाच एकमेव मुद्दा असेल.