डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबई-गोवा फेरीबोट
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2017 06:54 PM (IST)
प्रवासी आणि कार्गो वाहतूकही बोटीमधून केली जाणार असून त्यामुळे वेळ तर वाचणार आहेच, शिवाय प्रदूषणही कमी होणार असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं
प्रातिनिधीक फोटो
पणजी : रस्ता वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबई ते गोव्या दरम्यान फेरीबोट सेवा सुरु केली जाणार आहे. केंद्रीय जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली. प्रवासी आणि कार्गो वाहतूकही बोटीमधून केली जाणार असून त्यामुळे वेळ तर वाचणार आहेच, शिवाय प्रदूषणही कमी होणार असल्याचं गडकरींनी सांगितलं. दाबोळी आणि मोपा विमानतळ जलमार्गाने जोडण्याच्या शक्यतेवर विचार सुरु असून गोव्यात जलमार्ग विकसित करताना पर्यावरणाचे भान राखले जाणार असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं. मोठ्या हॉटेल्सनी तरंगत्या जेटी करुन पर्यटकांना जलमार्गावरुन थेट हॉटेलमध्ये प्रवेश द्यावा, असाही विचार आहे. गोव्यात ज्या प्रकल्पांना विरोध होईल ते प्रकल्प गोव्या शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेले जातील, असंही गडकरी म्हणाले. नद्यांचे राष्ट्रीयकरण केले जाण्याबाबत जे गैरसमज पसरवले जात आहेत, ते पूर्णतः चुकीचे असल्याचं गडकरी म्हणाले. केवळ जलमार्ग अधिसूचित केले जाणार आहेत. ते झाल्याशिवाय आपल्या खात्याला त्यावर पैसे खर्च करता येणार नाहीत. नद्या गोव्याच्या मालकीच्या असून त्या मी बॅगेत भरुन दिल्लीला नेणार नसल्याची कोपरखळीही गडकरींनी मारली.