नवी दिल्ली : आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. याशिवाय नोटाबंदीबाबत जनतेला आधीच सावध केल्याचंही मोदींनी मुलाखतीत सांगितलं.


नोटाबंदी झटका नाही

नोटाबंदी हा जनतेसाठी झटका नव्हता, वर्षभरापासून आम्ही जनतेला सावध केलं होतं, असा दावा नरेंद्र मोदींनी केला आहे. नोटाबंदी ही रातोरात झालेली प्रक्रिया नाही. आम्ही जनतेला आधीच सांगितलं होतं, बेहिशेबी मालमत्ता जमा केल्यास ठराविक दंड भरावा लागेल. मात्र सर्वांना वाटलं हा नेहमीच्या सरकारप्रमाणे फक्त घोषणा करणार, कृती नाही, त्यामुळे लोकांनी दुर्लक्ष केलं. या प्रस्तावाला कमी प्रतिसाद मिळाल्याने आपण कठोर पावलं उचलण्याचा इशाराही प्रसारमाध्यमांतून दिला होता, असं मोदी म्हणाले.

देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी अत्यावश्यक शस्त्रक्रिया होती. नोटाबंदीमुळे पैसा बँकिंग व्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थाही मजबूत झाली. करदात्यांची संख्या आणि करातून मिळणारे उत्पन्न वाढले, धनदांडग्यांकडे लपलेली संपत्ती बाहेर आली, असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी तत्कालीन एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. हा निर्णय जनतेसाठी धक्का मानला गेला होता.

जे आर्थिक गैरव्यवहार करुन परदेशात पळाले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करत आहोत, त्यांना आज ना उद्या भारतात परत आणलं जाईल, अशी ग्वाही मोदींनी मुलाखतीत दिली.

उर्जित पटेलांवर दबाव नव्हता

आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता, असा दावा मोदींनी मुलाखतीत केला आहे. पदत्याग करण्याच्या सहा-सात महिने आधीपासून उर्जित पटेल पद सोडण्याबाबत आग्रही होते, हे आपण पहिल्यांदाच उघड करत असल्याचंही मोदी म्हणाले. पटेल यांची कारकीर्द चांगली असल्याची स्तुतिसुमनंही मोदींनी उधळली.

काँग्रेसमुळे राम मंदिरात खोडा

70 वर्ष सत्ता गाजवणाऱ्यांनी राम मंदिर प्रलंबित ठेवलं, राम मंदिराच्या बांधणीत काँग्रेस खोडा घालत असल्याचा आरोपही नरेंद्र मोदींनी केला. राम मंदिरासाठी सरकार अध्यादेश आणणार नसून न्यायालयीन प्रक्रियेनंतर अध्यादेशाचा विचार सरकार करणार असल्याचं मोदी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसचे वकील अडथळे आणत असल्याचा दावाही त्यांनी केला.

जे गांधी कुटुंब वर्षानुवर्ष सत्तेत होतं, ते आता आर्थिक घोटाळ्यात जामिनावर बाहेर आहे, असा घणाघातही यावेळी मोदींनी केला. गांधी कुटुंबाला वाचवण्यासाठी काही जण कार्यरत असल्याचा आरोपही यावेळी मोदींनी केला.

पुन्हा सर्जिकल स्ट्राईकचे संकेत

उरी हल्ल्यामुळे बेचैन झालो होतो. त्याचप्रमाणे संतापही येत होता. सर्जिकल स्ट्राईक ही मोठी जोखीम होती, मात्र यशापेक्षा सैनिकांची काळजी जास्त होती, असंही मोदी म्हणाले. पाकिस्तान एका युद्धाने शहाणा होणार नाही, पाकला सुधरवण्यात खूप वेळ जाईल, असं सांगतानाच मोदींनी दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकचे संकेतही दिले आहेत.

2019 ची निवडणूक

2019 मधील लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध सर्व असेल, असंही मोदी म्हणाले. या निवडणुकीत महाआघाडीविरुद्ध जनता असेल, कारण मोदी म्हणजे जनतेचं प्रेम आणि आशिर्वादाचे प्रतीक असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

पाच राज्यातील अपयशावर आमचं चिंतन सुरु आहे. एक-दोन निवडणुकांमधील अपयश म्हणजे अधोगती नाही, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

जीएसटी सोपी प्रणाली

जीएसटीची प्रणाली साधी, सोपी आणि स्वस्त व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने बदल करत आहोत. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर घटले आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळाला, असंही मोदी म्हणाले. जीएसटीबाबत विरोधकांमध्येच गोंधळ असून छोट्या व्यापाऱ्यांना जो त्रास झाला, त्यावर शंकांचं निरसन केल्याचंही मोदींनी सांगितलं.

मध्यमवर्गीयांचं हित जपणं, हे आपलं कर्तव्य आहे. आधीच्या सरकारमध्ये 18 टक्क्यांवर पोहचलेला महागाई दर दोन-तीन टक्क्यांवर आणल्याचा दावाही मोदींनी केला. महागाई कमी झाल्याचा मध्यमवर्गीयांना फायदा झाल्याचंही ते म्हणाले.

मोदींच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे

-तिहेरी तलाक हा सामाजिक असमानतेचा मुद्दा, पाकिस्तानसह जगभरातील अनेक मुस्लिम देशात तिहेरी तलाकला बंदी असल्यामुळे हा विषय धार्मिक आस्थेचा नाही

-भारत हा एक सुरक्षित देश, भारतावर परदेशातून कौतुक होतं, निवडणुकांच्या तोंडावर देश असहिष्णु होत असल्याची टीका चुकीची

-मॉब लिंचिंगसारखे प्रकार देशाच्या प्रतिष्ठेसाठी मारक

-भाजप सर्वसमावेशक पक्ष नसल्याची एक प्रतिमा बनली आहे, त्यातून पक्षाला बाहेर पडायचं आहे