नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) 'सौभाग्य' या एका मोठ्या योजनेची घोषणा केली. या योजनेत अनेक वेगवेगळ्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.


देशातल्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकार सौभाग्य योजना जाहीर केली आहे. या योजनेतंर्गत गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन दिलं जाणार आहे. जनगणनेच्या आधारावर ही सुविधा दिली जाणार आहे.

16 हजार 320 कोटींची ही योजना आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओदिशा या राज्यातल्या जनतेला सौभाग्य योजनेचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत 5 एलईडी बल्ब, पंखा आणि सोलार पॉवर पॅक वाटले जाणार आहेत.

पंतप्रधान मोदी गरीब जनतेसाठी एका मोठ्या योजनेची घोषणा करतील अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली होती. दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, पंडित दिनदयाळ यांच्या नावानं पंतप्रधान मोदी ‘सौभाग्य’ ही मोठी योजना जाहीर केली आहे. याबाबत त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन माहिती देण्यात आली.


या योजनेत 8 प्रमुख गोष्टींवर भर देण्यात आला आहे. पाहा कोणत्या आहेत त्या 8 गोष्टी.

- प्रत्येक घरी वीज

- शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा

- रॉकेलला पर्यायी वस्तू उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

- आरोग्य क्षेत्रात सुधारणा

- कम्युनिकेशन क्षेत्रात सुधारणा

- सार्वजनिक सुरक्षेत सुधारणा

- रोजगाराच्या संधी वाढवणार

- जीवनशैली उंचवण्याचा प्रयत्न, विशेषत: महिलांसाठी

सौभाग्य योजनेचा शुभारंभ, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • 30 कोटी जनतेला बँकिंगशी जोडणारं सरकार येईल, असा कुणी विचारही केला होता का? : मोदी



  • देशात 4 कोटी घरांमध्ये आजही वीज नाही, जवळपास 20 टक्के नागरिक अंधारात : मोदी



  • देशातील 4 कोटी घरं आजही अंधारात असणं हे आपलं दुर्दैवं : मोदी



  • विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागतो, महिलांना अंधारात घरकामं करावी लागतात : मोदी



  • सौभाग्य योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवणार : मोदी



  • सरकार गरिबांच्या घरापर्यंत जाऊन मोफत वीज कनेक्शन देणार, एकही रुपया घेतला जाणार नाही : मोदी



  • गरिबांना मोफत वीज कनेक्शन, सरकार 16 हजार कोटी रुपये खर्च करणार : मोदी



  • एक हजार दिवसात वीज पोहोचवणं अधिकाऱ्यांनी अशक्य असल्याचं सांगितलं होतं, मात्र आज ते शक्य करुन दाखवलं : मोदी



  • देशाने वीज संकटाला मागे टाकलं आहे : मोदी



  • देशातील वीज व्यवस्था सुधरवण्यासाठी एकाच वेळी चार स्तरांवर काम करण्यात आलं : मोदी



  • मी पंतप्रधान झालो तेव्हा एलईडी बल्बची किंमत जवळपास 300 रुपये होते. आता याची किंमत 40 रुपये आहे : मोदी



  • तेलाचं उत्पादन करणाऱ्या देशांसोबत संबंघ दृढ करण्याचा प्रयत्न सुरु आहे : मोदी