नवी दिल्ली : निवडणुका म्हणजे लोकशिक्षणाचं महापर्व आहे. या निवडणुकांमधून जी संधी मिळाली आहे, ती जनतेची सेवा करण्यासाठी आहे. त्यामुळे जेवढ्या संधी मिळतील, तितक्यावेळेस ‘न्यू इंडिया’ बनवण्यासाठी प्रयत्न करणार, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान मोदींनी दिली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमधल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींचं दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी ही स्पष्टोक्ती दिली.


या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत झालं. यावेळी भाजप मुख्यालयापासून काही अंतरावरून मोदी पायीच चालत आले. यावेळी दोन्ही बाजूने उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी मोदींवर पुष्पवृष्टी केली. सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर मोदींनी भाजप मुख्यालयातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं. यानंतर भाजप मुख्यालयात मोदी दाखल होताच कार्यकर्त्यांनी मोदी मोदीच्या घोषणा देत संपूर्ण मुख्यालय दणाणून सोडलं होतं. भाजप अध्यक्ष अमित शहांच्या भाषणादरम्यानही कार्यकर्त्यांनी मोदींचा नारा लगावला. यामुळे काहीवेळासाठी अमित शहांना भाषणादरम्यान थांबावं लागलं.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ''2014 च्या निवडणुकीदरम्यान मी जे सांगत होतो. त्याचा वेगळाच अर्थ लावला जात होता. मात्र आज जेव्हा देशातील जनतेनं पुन्हा विश्वास दाखवला, तेव्हा त्याच बाबी पुन्हा सांगायचं धाडस करत आहे. लोकसभा निवडणुकांदरम्यान मी तीन बाबी प्रामुख्याने सांगितल्या, त्या चुकीच्या नव्हत्या, पण तशा त्या दाखवल्या जात होत्या.''

''मी सातत्यानं सांगत होतो की, आमच्याकडूनही चुका होऊ शकतात. पण वाईट उद्देशानं आम्ही काम करणार नाही. दुसरं म्हणजे, मी म्हणलं होतं की, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करु. आणि तिसरं म्हणजे, जे काही करु ते प्रामाणिकपणानं करु. त्यामुळेच मला नेहमी प्रश्न विचारला जातो की, तुम्ही इतकी मेहनत का घेता? पण  त्यांना मी सांगायचं आहे की, जेवढ्या संधी मिळतील तेवढ्या वेळी आम्ही नव्या भारताच्या निर्मितीसाठीच काम करु'' तसेच या निवडणुका या भावनिक आवाहन करुन नव्हे तर कामाच्या जोरावर मिळवल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधान मोदींचं संपूर्ण भाषण पाहा