नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. आता थेट पंतप्रधानांनीच यावर सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. मोबाईलवर 'नरेंद्र मोदी अॅप'च्या माध्यमातून मत नोंदवण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे.


एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर नागरिकांना मत व्यक्त करण्यास मोदींनी सांगितलं आहे. एका सर्व्हेच्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरं सहभागी व्यक्तींना द्यावी लागणार आहेत.

https://twitter.com/narendramodi/status/800940663244132352

नोटाबंदीच्या निर्णयावर तुम्ही किती समाधानी आहात?, इथपासून भारतात काळा पैसा आहे का? भ्रष्टाचार आणि काळ्या पैशास्वरुपी राक्षसाशी लढा देण्याची आवश्यकता आहे का? पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी आणण्याबाबत तुमचं मत काय, अशा प्रश्नांची उत्तरं मागवण्यात आली आहेत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला विरोधकांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावर घेरण्याची तयारी सुरु केली आहे. नागरिकांची गैरसोय होत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे, त्यामुळे सर्वेक्षणांच्या माध्यमातून आकडेवारी पडताळण्याचा मोदी सरकारचा विचार असावा.