सुरक्षा रक्षकांकडून वापरण्यात येणाऱ्या पॅलेट गनमुळे अनेक काश्मीरींना अंधत्व आलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानेही यावर पर्याय शोधण्यास सांगितलं होतं. त्यानुसार, गृह मंत्रालायने मध्य मार्ग काढत पॅलेट गनला पर्याय म्हणून प्लास्टिक बुलेट पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्लास्टिकच्या बुलेटमुळे जीविताला धोका नसतो. त्यामुळे हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यास सुरक्षा रक्षकांना याची मदत होऊ शकते. त्यामुळे गृह मंत्रालयाच्या वतीने प्लास्टिकच्या बुलेट सुरक्षा रक्षकांना देण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. विशेष करुन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सुरु असलेल्या चकमकीवेळी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक होत आहे. त्यामुळे त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून पावा शेल्स आणि पॅलेट गनचा वापर करण्यात येत आहे.
शनिवारी एका महाविद्यालयाचा ताबा सुरक्षा रक्षकांनी घेतल्याने त्यांच्यावर विद्यार्थ्यांकडून दगडफेक करण्यात आली. त्याला उत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये 68 विद्यार्थी जखमी झाले. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. पण त्याला पुन्हा हिंसक वळण लागल्याने पोलिसांना आश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पण यानंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली.