अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये भीषण अपघात झालाय. रावण दहनाचा कार्यक्रम पाहत असलेल्या लोकांवर ट्रेन चढली, ज्यामध्ये 58 जण मृत्यूमुखी पडले आहेत. पण तब्बल 200 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. यामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना पंजाब सरकार आणि केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं आहे.


रेल्वे रुळावर उभं राहून लोक रावण दहनाचा कार्यक्रम पाहत होते, अशी माहिती आहे. जालंधरहून अमृतसरला जाणाऱ्या ट्रेनने या लोकांना उडवलं. अमृतसरच्या जोडा फाटकजवळ हा रावण दहनाचा कार्यक्रम साजरा केला जात होता. दरम्यान, एकाचवेळी दोन्ही बाजूंनी आलेल्या ट्रेनने लोकांना उडवलं, असंही बोललं जात आहे.

काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंह सिद्धू यांच्या मतदारसंघातला हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला सिद्धूंच्या पत्नीही उपस्थित होत्या. कार्यक्रम साजरा केला जात असलेल्या ठिकाणी बाजूलाच रेल्वे रुळ आहे. रेल्वे रुळावर आणि बाजूलाही लोक उभे होते.

कार्यक्रम सुरु असतानाच अचानक रेल्वे आली आणि रुळावर उभे असलेल्या लोकांना उडवलं. मृतांचा आकडा मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण उत्सवाच्या वेळीच एक मोठी दुर्घटना घडली आहे.

दरम्यान, या अपघातावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना जखमींच्या मदतीसाठी तत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. शिवाय सर्व सरकारी यंत्रणाही मदतकार्याला लागली आहे.

प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं काय?

प्रत्यक्षदर्शींनी प्रशासनावर प्रंचड संताप व्यक्त केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे कार्यक्रमाची वेळ ही सायंकाळी सहा वाजताची होती. पण कार्यक्रमासाठी नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी येणार होत्या. त्या जवळपास साडे सात वाजता आल्या आणि ही ट्रेनची वेळ होती. विशेष म्हणजे ही घटना घडताच सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी घटनास्थळाहून पळ काढला. त्यामुळे लोक नवज्योत सिंह सिद्धू यांच्याविरोधात घोषणा देत आहेत.

प्रत्यक्षदर्शींचा दुसरा आक्षेप म्हणजे, ट्रेन येण्यापूर्वी कोणतीही सूचना देण्यात आली नाही. कार्यक्रमाच्या वेळी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी चालू होती, ज्यामुळे ट्रेनचा हॉर्न ऐकायला आला नाही. पण प्रशासनाने पूर्वसूचना देणं गरजेचं होतं, अशं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

अपघातावर कोण काय म्हणालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं म्हटलं आहे. अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले असल्याचं मोदींनी म्हटलंय.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या अपघाताच्या चौकशीचं आश्वासन दिलं आहे. ते स्वतः उद्या अमृतसरला जाऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना मोफत उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजपच्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांना मदतकार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत अमित शाहांनी जखमींनी लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत रेल्वेकडून सर्व प्रकारचं सहाय्य केलं जात असल्याचं सांगितलं आहे.

रेल्वेचं स्पष्टीकरण

रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड चेअरमन आणि इतर सर्व प्रमुख अधिकारी रात्रीच घटनास्थळावर पोहोचणार आहेत. ही घटना रेल्वे फाटकापासून काही अंतरावर घडली, जिथे लोक रेल्वे रुळावर उभे होते, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी स्मिता वत्स यांनी दिली.